"विमानतळाचे मुख्यालय मुंबईतच राहील, त्यासाठी शिवसेना आक्रमक भूमिका घेईल"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 03:30 PM2021-07-20T15:30:20+5:302021-07-20T15:32:11+5:30

vinayak raut : मुंबईचे अहमदाबाद करण्याचा हा डाव आहे, असे म्हणत विमानतळाचे मुख्यालय मुंबईतच राहील,त्यासाठी शिवसेना आक्रमक भूमिका घेईल, असा इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे. 

shiv sena leader vinayak raut opposed mumbai airport head office shifted at ahmedabad | "विमानतळाचे मुख्यालय मुंबईतच राहील, त्यासाठी शिवसेना आक्रमक भूमिका घेईल"

"विमानतळाचे मुख्यालय मुंबईतच राहील, त्यासाठी शिवसेना आक्रमक भूमिका घेईल"

googlenewsNext

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन करणाऱ्या अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड (एएएचएल) कंपनीचे मुख्यालय मुंबईतून गुजरातला हलवण्याचा निर्णय अदानी समूहाने घेतला आहे. या निर्णयावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. ही अत्यंत निषेधार्ह बाब असून मुंबईचे अहमदाबाद करण्याचा हा डाव आहे, असे म्हणत विमानतळाचे मुख्यालय मुंबईतच राहील,त्यासाठी शिवसेना आक्रमक भूमिका घेईल, असा इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे. 

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी 'TV-9 मराठी'शी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, 'ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे. मुंबईचे अहमदाबाद करण्याचे हे काम सुरू आहे. मुंबई विमानतळाचे महत्व कमी करून अहमदाबादचे महत्व वाढवण्याचे हे काम आहे. त्यापेक्षा अहमदाबादला स्वतंत्र स्टेट्सचा दर्जा देऊन त्याचे महत्व वाढावा. आयजीच्या जिवावर बायजीचा उद्धार आणि सासूच्या जीवावर जावई सुभेदार अशी वागणूक केंद्र सरकारच्या माध्यमातून केली जात आहे. शिवसेना हे सहन करणार नाही. मुंबई विमानतळाचे मुख्यालय हे मुंबईतच राहील, यासाठी शिवसेना आक्रमक राहील, असा इशारा विनायक राऊत यांनी दिला.

याचबरोबर, नागरी उड्डान मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची काल भेट घेतल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले. यावेळी ज्योतिरादित्य शिंदे यांच्याबरोबर सिंधुदुर्ग विमानतळ सुरू करण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. सिंधुदुर्ग विमानतळ विमान उड्डाणाला सज्ज झाले आहे. DGCA रिपोर्टची वाट पाहत आहोत. हा परवाना मिळवण्यासाठी 28 जूनला आयआरबीने अर्ज केला आहे. कोरोनामुळे डीजीसीए टीम सिंधुदुर्गात जाऊ शकलेली नाही. पण ती लवकरात लवकर जावी आणि लवकर परवाना मिळावा अशी आमची मागणी आहे. मंत्र्यांनी मला 8 ते 10 दिवसांत निर्णय कळवतो, असा शब्द मला दिला आहे. येत्या 8 – 10 दिवसात टीम सिंधुदुर्गात गेली आणि लगेच परवाना मिळाला तर गणेश चतुर्थीपूर्वी विमान उडायला काही हरकत नाही, असे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

'विमानतळावर झालेले दांडीया नृत्य बरंच काही सांगून जाते'
केंद्रात मोदी सरकार आल्यापासून मुंबईचे महत्त्व जाणीवपूर्वक कमी केले जात आहे. त्यासाठी येथील उद्योगधंदे व महत्त्वाची कार्यालये गुजरातमध्ये नेली जात आहेत, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यातच आता 'एएएचएल'चे मुख्यालय देखील गुजरातमध्ये हलवण्याचा निर्णय असल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. "मुंबई विमानतळाचे मुख्यालय मुंबईतून अहमदाबादला हलवणे हा मोदींचा महाराष्ट्राच्या जनतेला संदेश आहे. विमानतळावर झालेले दांडीया नृत्य बरंच काही सांगून जाते. मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी गेल्या ७ वर्षांत जे प्रयत्न झाले, त्याचा हा एक भाग आहे. जागतिक वित्तीय केंद्रही असेच गुजरातला नेले गेले," असे सचिन सावंत यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.


आम्हालाही आमचा 'झिंगाट' दाखवावा लागेल -  मनसे
नवी मुंबई विमानतळाचं व्यवस्थापन अदानी समूहाला मिळाल्यानंतर माजी आमदार आणि मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये फक्त व्यवस्थापन अदानींकडे गेलं आहे. विमानतळ मुंबईमध्येच आहे. त्यामुळे आम्हाला डीवचण्यासाठी 'गरबा' कराल तर आम्हालाही आमचा 'झिंगाट' दाखवावा लागेल, असा इशारा नितीन सरदेसाई यांनी दिला आहे. 

अदानी समूह एकूण ७४  टक्क्यांचा भागीदार होईल
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (मिआल) या कंपनीत जीव्हीके समुहाची हिस्सेदारी ५०.५० टक्के, बिडवेस्ट कंपनीचा हिस्सा १३.५० टक्के आणि ‘एअरपोर्ट कंपनी ऑफ साऊथ आफ्रिका’यांची भागीदारी १० टक्के होती. फेब्रुवारी २०२१मध्ये अदानी समुहाने २३.५० टक्के हिस्सा १ हजार ६८५ कोटी रुपयांना खरेदी केला.  आता जीव्हीके समुहाकडील ५०.५० टक्के हिस्सा ताब्यात आल्याने अदानी समूह एकूण ७४  टक्क्यांचा भागीदार होईल. उर्वरित २६ टक्के हिस्सा भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे आहे.

दरम्यान, टेकओव्हर पूर्ण झाल्यानंतर गौतम अदानी यांनी एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले की, जागतिक दर्जाच्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाचे टेकओव्हर केल्याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही मुंबईला गौरवान्वित वाटावे असे काम करू, हे आमचे वचन आहे. अदानी समूह व्यवसाय. लक्झरी आणि मनोरंजनासाठी भविष्यातील विमानतळांचे इकोसिस्टिम उभे करेल. आम्ही हजारो स्थानिक लोकांना नवा रोजगार देऊ, असं आश्वासन अदानी यांनी दिलं आहे.

गेल्या वर्षी तीन ठिकाणचे व्यवस्थापन मिळाले
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडची स्थापना २ मार्च २००६ रोजी झाली होती. ही कंपनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास, निर्मिती आणि परिचालनाचे काम करते. अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड ही अदानी एन्टरप्राईजेसची उपकंपनी त्यांच्या अखत्यारीतील विमानतळांचे व्यवस्थापन पाहते. गेल्या वर्षी मंगळुरू, लखनऊ आणि अहमदाबाद विमानतळाचे व्यवस्थापन अदानी समुहाच्या ताब्यात आले होते.

Web Title: shiv sena leader vinayak raut opposed mumbai airport head office shifted at ahmedabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.