"…त्याचीच किंमत तापसी आणि अनुरागला चुकवावी लागतेय", सामनातून मोदी सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 08:32 AM2021-03-05T08:32:27+5:302021-03-05T08:33:32+5:30

Shiv Sena criticizes central government : बॉलीवूडमधील भलेबुरे धंदे जणू समस्त देशवासीयांना माहीतच नव्हते असे केंद्रीय मंत्र्यांना म्हणायचे आहे काय?, असे सांगत शिवसेनेने सामनातून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावरही निशाणा साधला आहे.

Shiv Sena criticizes central government in its samana newspaper editorial on income tax department raid on taapsee pannu and anurag kashyap offices | "…त्याचीच किंमत तापसी आणि अनुरागला चुकवावी लागतेय", सामनातून मोदी सरकारवर निशाणा

"…त्याचीच किंमत तापसी आणि अनुरागला चुकवावी लागतेय", सामनातून मोदी सरकारवर निशाणा

googlenewsNext

दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) आणि अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) यांच्या घरावर आयकर विभागाने धाडी टाकल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. ही धाड राजकीय हेतूने केल्याचा आरोप करत विरोधकांकडून मोदी सरकारवर टीका केली जात आहे. तर याच मुद्द्यावरुन शिवसेनेने (Shiv Sena) सामना अग्रलेखाच्या माध्यमातून मोदी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. (Shiv Sena criticizes central government in its samana newspaper editorial on income tax department raid on taapsee pannu and anurag kashyap offices)

'अपवाद फक्त तापसी आणि अनुराग कश्यप यांचा'
देशातील राजकीय चित्र अधिकाधिक स्पष्ट होत आहे की, अधिकाधिक गोंधळाचे आणि गुंतागुंतीचे होत आहे? केंद्र सरकारविरुद्ध टीका करणे म्हणजे देशद्रोह नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले असतानाच मोदी सरकारविरुद्ध परखड बोलणाऱ्या कलाकार, सिनेसृष्टीतील निर्माते-दिग्दर्शकांवर ‘इन्कम टॅक्स’ने धाडी घालायला सुरुवात केली आहे. तापसी पन्नू, अनुराग कश्यप, विकास बहल, सिने वितरक मधू मँटेना हे त्यात प्रमुख आहेत. मुंबई-पुण्यात ३० पेक्षा जास्त ठिकाणी धाडी घातल्या. तापसी पन्नू, अनुराग कश्यप हे त्यांची मते परखडपणे मांडत असतात. एक प्रश्न यामुळे असा निर्माण होतो की, हिंदी सिनेसृष्टीतले इतर सर्व व्यवहार, उलाढाली स्वच्छ आणि पारदर्शक आहेत, अपवाद फक्त तापसी आणि अनुराग कश्यप यांचा, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

"...त्याची किंमत त्यांना चुकवावी लागत आहे"
सिनेसृष्टीतल्या अनेक महान उत्सवमूर्तींनी शेतकरी आंदोलनासंदर्भात विचित्र भूमिका घेतली. त्यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा तर दिला नाहीच, उलट जगभरातून जे लोक शेतकऱ्यांना पाठिंबा देत होते त्यांचा पाठिंबा म्हणजे आपल्या देशात ढवळाढवळ असल्याचे मत या उत्सवमूर्तींनी व्यक्त केले. पण तापसी, अनुराग कश्यपसारखी मोजकी मंडळी शेतकरी आंदोलनाच्या बाजूने उभी राहिली. त्याची किंमत त्यांना चुकवावी लागत आहे, असे म्हणत शिवसेनेने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानेच त्यांच्यावर कारवाई होत असल्याचे म्हटले आहे.

बॉलीवूडमधील कोटीच्या कोटी उड्डाणे गंगाजलाच्या प्रवाहातून वर येतात?
२०११ मध्ये केलेल्या एका व्यवहारासंदर्भात हे छापे आहेत. या मंडळींनी एक ‘प्रॉडक्शन हाऊस’ स्थापन केले व त्याबाबत करचुकवेगिरीचा हा मामला आहे. ज्याअर्थी इन्कम टॅक्सने धाडी घातल्या त्याअर्थी कुठे तरी गडबड आहेच, पण धाडी घालण्यासाठी किंवा कारवाई करण्यासाठी फक्त याच लोकांची का निवड केली? तुमच्या त्या ‘बॉलीवूड’मध्ये जी कोटीच्या कोटी उड्डाणे रोज होत असतात ते काय गंगाजलाच्या प्रवाहातून वर येतात? पण व्यवहारात कोठे तरी पाणी मुरतच असल्याने सरकारच्या तालावर नाचायचे व बोलायचे हेच आतापर्यंत घडत आले. त्यातले काही लोक मात्र स्वाभिमानी किंवा वेगळ्या धाटणीचे असतात, असेही सामनातून म्हटले आहे.

सगळ्यांचे व्यवहार,उलाढाली धुतल्या तांदळाप्रमाणे स्वच्छ आहेत काय?
मुळात ‘बॉलीवूड’ लॉक डाऊन काळात प्रचंड अडचणीत आहे. चित्रीकरण, नव्या निर्मिती बंद आहेत. सिनेमागृहे बंद आहेत. एक मोठा उद्योग व्यवसाय आर्थिक संकटात सापडला असताना त्यावर राजकीय सूडबुद्धीने असे हल्ले करणे योग्य नाही. मोदी सरकारची उघड चमचेगिरी करणारे कित्येकजण सिनेसृष्टीत आहेत. त्यातले अनेकजण तर मोदी सरकारचे सरळ लाभार्थीच आहेत. त्या सगळ्यांचे व्यवहार आणि उलाढाली धुतल्या तांदळाप्रमाणे स्वच्छ आहेत काय? भाजप आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केल्यामुळे कारवाई होत असल्याचे आरोप माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी फेटाळले आहेत. तपास यंत्रणांकडे जी खात्रीशीर माहिती येते त्याआधारे कारवाई केली जाते, अशी ‘दिव्य’ माहिती जावडेकरांनी दिली आहे. म्हणजे बॉलीवूडमधील भलेबुरे धंदे जणू समस्त देशवासीयांना माहीतच नव्हते असे केंद्रीय मंत्र्यांना म्हणायचे आहे काय?, असे सांगत शिवसेनेने सामनातून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावरही निशाणा साधला आहे.

'सत्ताधाऱ्यांच्या पालखीचे भोई होता येत नाही'
सगळ्यांनाच सत्ताधाऱ्यांच्या पालखीचे भोई होता येत नाही. काहीजण पाठीला कणा आहे हे वेळप्रसंगी दाखवत असतात व पडद्यावर ज्या संघर्षमय भूमिका करतात त्याप्रमाणे प्रत्यक्ष जीवनात जगण्याचा प्रयत्न करतात. ‘पिंक’, ‘थप्पड’, ‘बदला’ अशा चित्रपटांत तापसीने केलेल्या भूमिका ज्यांनी पाहिल्या त्यांना तापसी इतकी बाणेदार का? असे कोडे पडणार नाही. अनुराग कश्यपच्या बाबतीतही तेच म्हणावे लागेल. त्यांचे विचार कदाचित पटत नसतील, पण त्यांना त्यांचे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहेच.

'...यात देशाचीच बेइज्जती होतेय'
दीपिका पदुकोणने ‘जेएनयू’मध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांची भेट घेताच तिच्याबाबतीतही छुपे आंदोलन, बहिष्काराचे हत्यार चालविण्यात आले. दीपिकाचे चित्रपट ठरवून पाडण्याचे प्रयोग झालेच, पण समाजमाध्यमांवर तिच्याविरुद्ध घाणेरड्या मोहिमादेखील राबविण्यात आल्या. हे सर्व करणारे कोण आहेत किंवा कोणत्या विचारप्रवाहाचे आहेत ते सोडून द्या, पण अशा कृतीतून ते देशाची प्रतिष्ठा नक्कीच वाढवत नाहीत. पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला ज्या घृणास्पद पद्धतीने अटक केली त्यावर जगभरात मोदी सरकारवर टीका झाली. यात देशाचीच बेइज्जती होत असते. गोमांस प्रकरणात झुंड-बळी गेले, पण भाजपाशासित राज्यांत गोमांस विक्री जोरात सुरूच आहे. यावर कोणीच कसे बोलायचे नाही? सर्वच प्रकारच्या स्वातंत्र्याचे हवन सध्या देशात होत आहे. त्यात केंद्रीय तपास यंत्रणांचे निःपक्ष काम करण्याचे स्वातंत्र्यही जळून गेले आहे. तापसी, अनुराग कश्यपप्रकरणी तेच घडले आहे!,” अशी टीका शिवसेने सामनातून भाजपावर केली आहे.

Web Title: Shiv Sena criticizes central government in its samana newspaper editorial on income tax department raid on taapsee pannu and anurag kashyap offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.