राजपूत समाजाच्या मतांसाठी भाजपाकडून सुशांतसिंह प्रकरणाचे राजकारण - गुलाबराव पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2020 09:46 PM2020-10-18T21:46:13+5:302020-10-18T21:47:40+5:30

Gulabrao Patil : गुलाबराव पाटील हे रविवारी सायंकाळी जळगाव येथे अजिंठा विश्रामगृहात  पत्रकारांशी बोलत होते.

Politics of Sushant Singh case from BJP for votes of Rajput community - Gulabrao Patil | राजपूत समाजाच्या मतांसाठी भाजपाकडून सुशांतसिंह प्रकरणाचे राजकारण - गुलाबराव पाटील 

राजपूत समाजाच्या मतांसाठी भाजपाकडून सुशांतसिंह प्रकरणाचे राजकारण - गुलाबराव पाटील 

Next
ठळक मुद्देभाजपा नेत्यांच्या या टीकेला आता वर्ष होत आले आहे. पण अजूनही सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. यापुढेही पाच वर्षे आमचे सरकार काम करतच राहील, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला.

जळगाव : भाजपाला बिहारमध्ये राजपूत समाजाची मते हवी आहेत. राजपूत समाजाच्या आठ टक्के मतांवर डोळा ठेवूनच भाजपाकडून सुशांतसिंह राजपूत जिंदाबाद असा नारा दिला जात आहे, असा टोला शिवसेनेचे प्रवक्ते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी भाजपाला लगावला.

गुलाबराव पाटील हे रविवारी सायंकाळी जळगाव येथे अजिंठा विश्रामगृहात  पत्रकारांशी बोलत होते. यावेळी गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेचा दसरा मेळावा, बिहार निवडणूक, भाजपा नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर होणारी टीका अशा विषयांवर मते मांडली. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याला न्याय देण्यासाठी राज्य सरकारच्या विरोधात सगळ्या गोष्टी करण्यात आल्या. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू असताना विरोधकांनी केलेल्या मागणीनुसार, सीबीआयने तपास हाती घेतला.

दीड महिने तपास केल्यानंतर त्यात काय तथ्य निघाले तर सुशांतसिंहने आत्महत्या केली. त्याचे ड्रग्ज कनेक्शन समोर आले. ही गोष्ट राज्य सरकार सांगत नाही, विरोधकांच्या आग्रहानुसार जी एजन्सी या प्रकरणाच्या तपासकामी नेमण्यात आली, तिच्या तपासात या बाबी समोर आल्या आहेत. आम्ही सुरुवातीपासून सांगत आहोत की सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण हे भाजपने सोडलेले पिल्लू आहे. भाजपला बिहारमध्ये राजपूत समाजाची असलेली आठ टक्के मते हवी आहेत. म्हणूनच ते सुशांतसिंह जिंदाबाद असे म्हणत आहेत.

कितीही टीका केली तरी आमचे सरकार पाच वर्षे काम करणार
भाजपा नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर तीन चाकी सायकल म्हणून टीका केली जात असून हे सरकार कधीही कोसळेल, असे वारंवार सांगितले जात आहे. याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता गुलाबराव पाटील म्हणाले की, भाजपा नेत्यांच्या या टीकेला आता वर्ष होत आले आहे. पण अजूनही सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. यापुढेही पाच वर्षे आमचे सरकार काम करतच राहील, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला.

दसरा मेळावा वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार होणार
शिवसेनेचा मुंबईत होणारा दसरा मेळावा यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होईल किंवा नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. याबाबत गुलाबराव पाटील म्हणाले की, शिवसेनेचा दसरा मेळावा कसा होईल, याचा निर्णय येत्या काही दिवसात होईल, असे आमचे नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे. हा मेळावा कशा पद्धतीने होईल, हे वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार निश्चित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शरद पवार यांच्या प्रयत्नामुळे सत्ता
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची वर्षभरापूर्वी सातारा येथे भरपावसात जाहीर सभा झाली होती. वयाने ज्येष्ठ असल्याने नेत्याने अशा पद्धतीने सभा घेतल्याने त्यावेळी जनतेची सहानुभूती देखील मिळाली होती. ही सभा अविस्मरणीय होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची देखील अशाच पद्धतीने सभा झाली होती, अशी आठवण सांगत गुलाबराव पाटील यांनी शरद पवार यांच्या प्रयत्नानेच आजची ही सत्ता असल्याचे सांगितले.

Web Title: Politics of Sushant Singh case from BJP for votes of Rajput community - Gulabrao Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.