“राजकारणात असलो तरी...”; राज ठाकरेंच्या भूमिकेनंतरही आमदार राजू पाटील भूमिपुत्रांच्या मोर्चात उतरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 09:50 PM2021-06-23T21:50:31+5:302021-06-23T21:52:50+5:30

मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी नवी मुंबई विमानतळ हे मुंबई विमानतळाचाच विस्तारीत भाग आहे असा तर्क लावत त्यामुळे या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज हेच नाव राहील असं म्हटलं होतं.

Navi Mumbai Airport name issue,MNS MLA Raju Patil Participate in Agitation for Demand D.B Patil | “राजकारणात असलो तरी...”; राज ठाकरेंच्या भूमिकेनंतरही आमदार राजू पाटील भूमिपुत्रांच्या मोर्चात उतरणार

“राजकारणात असलो तरी...”; राज ठाकरेंच्या भूमिकेनंतरही आमदार राजू पाटील भूमिपुत्रांच्या मोर्चात उतरणार

Next
ठळक मुद्देभूमिपुत्रांनी दि. बा. पाटील यांच्या नावासाठी आग्रह कायम ठेवत आंदोलनाची ठाम भूमिका घेतली.आताच्या घडीला तर माझा पूर्ण समाज या आंदोलनात उतरला आहे. राजकारणात असलो तरी लोकभावना आणि समाजकारण हेच माझं पहिलं प्राधान्य आहे.

मुंबई – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ज्येष्ठ नेते दि. बा पाटील यांचे नाव देण्यात यावं या मागणीसाठी २४ जून रोजी स्थानिक भूमिपुत्र सिडको भवनाला घेराव घालणार आहे. हा मोर्चा प्रचंड मोठ्या प्रमाणात काढणार असून अनेक पक्षाचे नेते यात सहभागी होणार आहे. शिवसेनेने नवी मुंबईविमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी केली आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद पेटला आहे.

यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळ हे मुंबई विमानतळाचाच विस्तारीत भाग आहे असा तर्क लावत त्यामुळे या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज हेच नाव राहील असं म्हटलं होतं. मात्र राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर या प्रकरणात संभ्रम निर्माण झाला. मात्र तरीही भूमिपुत्रांनी दि. बा. पाटील यांच्या नावासाठी आग्रह कायम ठेवत आंदोलनाची ठाम भूमिका घेतली. परंतु राज ठाकरेंच्या भूमिकेनंतरही मनसेचे आमदार राजू पाटील यांनी आंदोलनात उतरणार असल्याचं जाहीर केले आहे.

याबाबत आमदार राजू पाटील म्हणाले की, राजसाहेब ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबाबत वस्तुनिष्ठ तांत्रिक बाजू मांडली आहे. त्यानंतर अनेकजण विपर्यास करुन त्याचा वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला गेला. राहता राहिला प्रश्न २४ जूनच्या आंदोलनाचा. तर मी नम्रपणे आणि ठामपणे सांगू इच्छितो की हा मोर्चा आगरी, कोळी, कुणबी, कऱ्हाडी आणि शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या भूमीपुत्रांनी काढलेला मोर्चा आहे. राज्यभर जेव्हा मराठा आरक्षणासाठी लाखोंचे मूकमोर्चे निघत होते, तेव्हा जनभावना आणि सामाजिक जबाबदारी म्हणून आंदोलनात सहभागी झालो होतो असं त्यांनी सांगितले.

त्यामुळे आताच्या घडीला तर माझा पूर्ण समाज या आंदोलनात उतरला आहे. त्यांच्या भावनेचा आणि विचारांचा कुटुंबातील एक सदस्य आणि लोकप्रतिनिधी म्हणून मला आदर आहे. कारण त्यांच्या  प्रेमामुळेच आपण इथवर पोहोचलो आहोत. त्यामुळे राजकारणात असलो तरी लोकभावना आणि समाजकारण हेच माझं पहिलं प्राधान्य आहे. म्हणूनच ज्यांनी माझ्या संपूर्ण समाजाला आणि भूमिपुत्रांना रस्त्यावर उतरण्यासाठी भाग पाडलंय, त्यांचा निषेध करण्यासाठी आणि भूमीपुत्रांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी या मोर्चात सहभागी होणार आहोत असं आमदार राजू पाटील म्हणाले.

काय म्हणाले राज ठाकरे?

'मुंबईत विमानतळाला असलेली जागा कमी पडू लागली आहे. त्यामुळे नवी मुंबईत विमानतळ उभारलं जात आहे. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला आणि देशांतर्गत विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे नवी मुंबईतील विमानतळालादेखील शिवरायांचंच नाव दिलं जावं,' असं राज ठाकरे म्हणाले. 'बाळासाहेब ठाकरे आदरणीय आहेतच. दिवंगत दि. बा. पाटील ज्येष्ठ नेते होते. पण नवी मुंबईतील विमानतळ हे मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचाच भाग आहे ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. मुंबईत जागा नसल्यानं नवी मुंबईत विमानतळ उभारलं जात आहे. त्या विमानतळाचा आंतरराष्ट्रीय कोडदेखील मुंबई विमानतळाप्रमाणेच BOM असा असणार आहे. त्यामुळे त्या विमानतळाला छत्रपती शिवरायांचं नाव देण्यात यावं,अशा शब्दांत राज यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

'महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे. परदेशातून येणारा माणूस हा शिवरायांच्या भूमिकेत येत असतो. त्यामुळे विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज हेच नाव संयुक्तिक असेल. आज बाळासाहेब असते, तर त्यांनी स्वत:देखील शिवरायांचंच नाव विमानतळाला देण्याचा सल्ला दिला असता. विमानतळाला शिवरायांचं नाव दिलं जाणार असेल तर कोणाचाही त्याला विरोध नाही. स्थानिकदेखील त्याला विरोध करणार नाहीत, असं प्रशांत ठाकूर यांनी मला सांगितलं आहे,' असं राज म्हणाले.

Web Title: Navi Mumbai Airport name issue,MNS MLA Raju Patil Participate in Agitation for Demand D.B Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.