“जमलं तर मंत्रिमंडळातील "सखाराम बायंडर" प्रवृत्तींचे करायचे काय? यावर चिंतन करा”

By प्रविण मरगळे | Published: February 13, 2021 10:24 AM2021-02-13T10:24:40+5:302021-02-13T10:26:12+5:30

BJP Ashish Shelar Comment on Shiv Sena Criticism: शिवसेनेने सामना अग्रलेखातून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाला टार्गेट केले होते, त्यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे

BJP Ashish Shelar Answer to Shiv Sena over denied use of Aircraft to Bhagat Singh Koshyari | “जमलं तर मंत्रिमंडळातील "सखाराम बायंडर" प्रवृत्तींचे करायचे काय? यावर चिंतन करा”

“जमलं तर मंत्रिमंडळातील "सखाराम बायंडर" प्रवृत्तींचे करायचे काय? यावर चिंतन करा”

Next
ठळक मुद्देभारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेचे करायचे काय? असं विचारताय का? एक दिवस आधीच सरकारने परवानगी नाकारूनही राजभवनाने राज्यपालांना विमानात नेऊन का बसवले?ठाकरे सरकार आल्यापासून हेच तर सुरु आहे. घटनेनुसार शपथ घेतली नाही, घटनेनुसार सभागृहात वागत नाही.

मुंबई – सरकारी विमानातून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना उतरवल्यानंतर या वादाला राजकीय रंग लागला आहे, भाजपाने ठाकरे सरकारवर आरोप करत द्वेषापोटी राज्यपालांना अशी वागणूक दिली देण्यात आली, इतका अंहकार करू नका असं म्हटलं होतं, तर यावर भाजपाच्या तोंडून अहंकाराची भाषा शोभत नाही, राज्यपालांचे काय करायचं हा भाजपाचा प्रश्न आहे असा टोला शिवसेनेने लगावला होता.

शिवसेनेने सामना अग्रलेखातून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाला टार्गेट केले होते, त्यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे, शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, राज्यपालांचे करायचे काय असा प्रश्न पडलाय? म्हणजे भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेचे करायचे काय? असं विचारताय का? तीच तुमची खरी अडचण आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. (Ashish Shelar Target Shiv sena over criticism of governor Bhagat Singh Koshyari)

तसेच ठाकरे सरकार आल्यापासून हेच तर सुरु आहे. घटनेनुसार शपथ घेतली नाही, घटनेनुसार सभागृहात वागत नाही. घटनेनुसार विधिमंडळाचे कामकाज होत नाही. घटनेनुसार आमदारांना दिलेले हक्क तुम्हाला मान्य नाही. पंतप्रधान, राज्यपाल, न्यायाधीश अशा घटनात्मक पदांचा आदर करीत नाही. राज्यपालांचे करायचे काय? यापेक्षा जमलं तर मंत्रिमंडळातील "सखाराम बायंडर" प्रवृत्तींचे करायचे काय? यावर चिंतन करा असा चिमटा भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला काढला आहे.

काय म्हटलं होतं सामना अग्रलेखात?

राज्यपालांच्या कार्यालयाने विमान उडवण्याची परवानगी मागितली व एक दिवस आधीच सरकारने परवानगी नाकारूनही राजभवनाने राज्यपालांना विमानात नेऊन का बसवले? असा हटवादीपणा करण्याचे कारण काय? राज्यपालांचा हा दौरा खासगी स्वरूपाचा होता. त्यामुळे नियमाने सरकारी विमानाचा वापर करता येणार नाही, असे कळवूनही राज्यपाल विमानात बसले, पण महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) हा विमान-वाद वेगळय़ाच हवेत उडवू लागले आहेत. राज्यपालांना विमान नाकारले हा सरकारचा अहंकार असल्याचा टोला फडणवीस यांनी मारला. भाजपा नेत्यांच्या तोंडात अहंकाराची भाषा शोभत नाही. सध्या अहंकाराचे राजकारण कोण करीत आहे ते संपूर्ण देश जाणतोय.

...तर घटनेचा अपमान

फडणवीसांनी घटनात्मक सल्लागारांकडून हा विषय समजून घेतला पाहिजे. राज्यपालांना राजकीय कळसूत्री बाहुल्याप्रमाणे पुणी नाचवणार असेल तर तो घटनेचाही अपमान आहे. राज्यपाल हे पूर्वाश्रमीचे संघ विचारक, प्रचारक असण्याशी महाराष्ट्राला देणेघेणे नाही. अर्थात ते त्या विचारांचे असल्यानेच त्यांना हेरून महाराष्ट्राच्या राजभवनात पाठवले आहे. महाराष्ट्र त्या विचारांचाही आदर करतो. पण भाजपच्या सत्तेचा डाव मोडला म्हणून महाराष्ट्रातील आघाडी सरकारला संधी मिळेल तेव्हा आडवे जाणे घटनेच्या कोणत्या कलमात बसते? महाराष्ट्र सरकारने एखाद्या गुन्हेगारावर कारवाई केली की, त्या गुन्हेगाराच्या बाजूने भाजपने काव काव करायची व लगेच राजपालांनी त्या व्यक्तीस सन्माननीय अतिथी म्हणून चहापानास बोलवायचे हे कोणत्या घटनात्मक संस्कृतीत बसते? असा सवालही शिवसेनेने(Shivsena) विचारला आहे.

राज्यपालांनी अनेक संकेत पायदळी तुडवले

राज्यपालांनी सरकारच्या अजेंड्यावर चालायचे असते, विरोधी पक्षाच्या नाही. हे संकेत महाराष्ट्रात पायदळी तुडवले जाणे हाच काळा दिवस मानायला हवा. काळा दिवस पाळून निषेध करावा अशा अनेक घटना महाराष्ट्रात व देशात घडल्या असताना महाराष्ट्रातील भाजपा(BJP) चूप बसला. भाजपाच्या अधःपतनाचा शेवटचा अंक अशा पद्धतीने सुरू झाला आहे व त्या नाट्यात त्यांनी राज्यपालांना खलनायकाची भूमिका दिली आहे. राजभवनात नियम, कायद्याची अशी पायमल्ली होणे ही काळी कृत्ये आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयास भारतीय संविधान, नियम, कायदा वगैरेंची चाड असेल तर अशा राज्यपालांचे पूर्ण वस्त्रहरण होण्याआधी गृहमंत्रालयाने त्यांना परत बोलवायला हवे. राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून केंद्राला आघाडी सरकारवर नेम धरता येणार नाही. सरकार स्थिर व मजबूत आहे आणि राहील. राज्यपालांचे काय करायचे हा भाजपचा प्रश्न असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

Web Title: BJP Ashish Shelar Answer to Shiv Sena over denied use of Aircraft to Bhagat Singh Koshyari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.