Amit Shah in Lok Sabha : अमित शाहंचा ओवेसींवर निशाणा, "तुमच्या मनात सर्वकाही हिंदू-मुस्लीम... मी समजतो"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 03:56 PM2021-02-13T15:56:51+5:302021-02-13T15:59:07+5:30

Amit Shah in Lok Sabha : अधिकाऱ्यांना हिंदू मुस्लीम असं विभागून तुम्ही स्वस्ताला सेक्युलर म्हणवता का?,शाह यांचा ओवेसींना सवाल

amit shah spoke in lok sabha on article 370 and jk reorganisation amendment act criticize mim asaduddin owaisi | Amit Shah in Lok Sabha : अमित शाहंचा ओवेसींवर निशाणा, "तुमच्या मनात सर्वकाही हिंदू-मुस्लीम... मी समजतो"

Amit Shah in Lok Sabha : अमित शाहंचा ओवेसींवर निशाणा, "तुमच्या मनात सर्वकाही हिंदू-मुस्लीम... मी समजतो"

Next
ठळक मुद्देअधिकाऱ्यांना हिंदू मुस्लीम असं विभागून तुम्ही स्वस्ताला सेक्युलर म्हणवता का?,शाह यांचा ओवेसींना सवाल जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरूस्ती) विधेयक २०२१ लोकसभेत पारित.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी लोकसभेत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी कलम ३७० हटवण्यावरून सुरू असलेल्या राजकारणावरही उत्तर देत विरोधकांना धारेवर धरलं. "या ठिकाणी विचारण्यात आलं की कलम ३७० हटवल्यानंतर जी आश्वासनं दिली त्या दृष्टीनं काय केलं गेलं? कलम ३७० हटवून १७ महिने झाले आणि तुम्ही आमच्याकडून हिशोब मागत आहात. तुम्ही ७० वर्षांत काय केलं याचा हिशोब आणलाय का? जर ७० वर्ष योग्यरित्या चालला असता तर आमच्याकडून हिशोब मागायची वेळ आली नसती. ज्यांना पिढ्यानपिढ्या शासन करण्याची संधी मिळाली त्यांनी स्वत:कडे पाहून ठरवावं की आपण हिशोब मागण्याच्या लायक आहोत का?," असं म्हणत शाह यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. आतापर्यंत प्रशासनच तिकडे परिस्थिती सांभाळतच होतं तितक्यात कोरोनाची महासाथ आली. मी सर्व कामांचा तुम्हाला हिशोब देतो असंही शाह म्हणाले. 

जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरूस्ती) विधेयक 2021वर बोलताना शाह यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावरही निशाणा साधला. "तुम्ही अधिकाऱ्यांचे हिंदू मुस्लीम म्हणून विभाजन करत आहात. तुमच्या मनात प्रत्येक गोष्ट हिंदू मुस्लीम आहे. मी तर तुम्हाला समजतो. एक मुस्लीम अधिकारी हिंदू जनतेची आणि हिंदू अधिकारी मुस्लीम जनतेची सेवा करू शकत नाही का? अधिकाऱ्यांना हिंदू मुस्लीम असे विभागून तुम्ही स्वतःला सेक्युलर म्हणवता का?," असा टोला शाह यांनी ओवेसींनाही लगावला.
दबावात ४ जी सेवा सुरू नाही

यापूर्वी ओवेसी यांनी सरकारवर निशाणा साधत काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय दबावाखाली येऊन ४ जी सेवा सरकारनं सुरू केल्या आरोप केला होता. यावरही अमित शाह यांनी उत्तर दिलं. "ओवेसी हे ज्यांचं समर्थन करतात ते युपीएचं सरकार आता नाही. हे नरेंद्र मोदी यांच्या भाजपचं सरकार आहे. या देशाचे निर्णय हा देशच करतो, इथली संसद करते, आमच्यावर कोणीही दबाव आणू शकत नाही," असंही शाह यांनी स्पष्ट केलं. 

अधीर रंजन चौधरींवर निशाणा

चर्चेदरम्यान अमित शाह यांनी काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्लाबोल केला. "तुम्ही आम्हाला विचारत आहात? तुम्ही तर मोबाईलच बंद केले होते आणि २० वर्षांसाठी बंद केले होते. त्यावेळी सर्व अधिकारी कुठे गेले होते?," असा सवाल शाह यांनी केला.

आतापर्यंत तीनच कुटुंबांचं शासन

"काश्मीरमध्ये आतापर्यंत तीन कुटुंबांचचं शासन होतं आणि यासाठी कलम ३७० हटवण्यावर त्रास होत आहे. आम्ही जम्मू काश्मीरमध्ये पंचायत राजची स्थापना केली. निवडणुकांमध्ये घोटाळा झाला याचा आरोप कोणीही करू शकत नाही. जम्मू काश्मीरमध्ये सर्व अधिकारी हे भारतमातेचेच सुपुत्र आहेत. राजा राणीच्या पोटी जन्म घेणार नाही तर मतांमधून घेईल," असंही शाह यावेळी म्हणाले. जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरूस्ती) विधेयक २०२१ चं जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याशी कोणत्याही प्रकारचं घेणंदेणं नाही. योग्य वेळ आल्यानंतर जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यात येणार असल्याचंही शाह यांनी स्पष्ट केलं. 

कोणाच्या दबावाखाली ३७० कायम होतं?

"कोणाच्या दबावाखाली इतके वर्ष कलम ३७० कायम ठेवण्यात आलं होतं? तुम्ही १७ महिन्यांचा हिशोब मागत आहात ७० वर्षांपर्यंत जेव्हा कलम ३७० लागू होतं तेव्हा का हिशोब मागत नव्हता? तात्पुरत्या स्वरूपातील कलम हटवण्यात आलं नाही कारण तुम्हाला मतांचं राजकारण करायचं होतं," असा आरोपही शाह यांनी यावेळी केला.

विकासाला प्राधान्य

जम्मू काश्मीरमध्ये विकासाला आम्ही प्राधान्य देत आहोत आणि तेच आमच्या हृदयातही आहे. आतापर्यंत २८ योजना पूर्ण करण्यात आल्या. याव्यतिरिक्त २०२२ पूर्ण जम्मू काश्मीरमधील २५ हजार बेरोजगारांना नोकरीदेखील देणार असल्याचं आश्वासन शाह यांनी दिलं. "पंतप्रधानांनी जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याच्या दर्जा परत देणार असल्याचं आश्वासन दिल्याचं म्हटलं जात आहे. होय त्यांनी आश्वासन दिलं होतं आणि मी जनतेला विश्वास देऊ इच्छितो की योग्य वेळ आल्यानंतर जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात येईल. जम्मू काश्मीर आणि लेहच्या मुद्द्यावर राजकारण करण्याची गरज नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

Web Title: amit shah spoke in lok sabha on article 370 and jk reorganisation amendment act criticize mim asaduddin owaisi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.