कणकवली तालुक्यात सरासरी 70 टक्के शांततेत मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 10:40 PM2017-10-16T22:40:10+5:302017-10-16T22:49:38+5:30

कणकवली तालुक्यातील 58 पैकी 49 ग्रामपंचायतींसाठी सोमवारी शांततेत सरासरी 70 टक्के मतदान झाले. तालुक्यात सरपंच व सदस्य पदासाठीच्या 712 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. 9 ग्रामपंचायती पूर्णतः बिनविरोध झाल्या आहेत.

कणकवली तालुक्यातील 49 गावात सोमवारी मतदान झाले. या प्रक्रियसाठी 1184 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते . सकाळी 7.30 वाजल्या पासून मतदानाला प्रारंभ झाला.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची गेले दहा दिवस जोरदार सुरु असलेली रणधुमाळी मतदानानंतर संपली. आता मंगळवारी मतमोजणीनंतर काय निकाल लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

प्रांताधिकारी नीता शिंदे- सावंत , तहसीलदार वैशाली माने, निवासी नायब तहसीलदार भारतभूषण रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली होती.

काही ठिकाणी शाब्दिक बाचाबाचीच्या घटनांव्यतिरिक्त कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान झाले.