मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यानंतर आता केंद्रीय पथक दाखल, मदत कधी ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 03:42 PM2020-06-16T15:42:54+5:302020-06-16T15:59:36+5:30

निसर्ग चक्रीवादळ जाऊन आज 10 दिवस लोटले आहेत. मात्र रायगडवासीयांच्या मनामध्ये अद्यापही वादळाचे माजलेले काहूर शांत झालेले नाही. सरकारच्या मदतीकडे सारे डोळे लावून बसले आहेत.

पंचनाम्याची फुटपट्टी न लावता तातडीने थेट आपादग्रस्तांच्या हातात मदत देण्याची हीच ती वेळ आहे. हे सरकारने आता ध्यानात घ्यावे, अन्यथा रायगडवासी कधीच उभा राहू शकणार नाही.

निसर्ग चक्रीवादळानंतरची जिल्ह्यातील परिस्थिती अतिशय भयाण झाली आहे. लाखो नागरिकांच्या घरांच्या भिंती पडल्या आहेत, घरांचे छप्पर वादळात उडून गेले आहे. धरणीची उशी आणि आभाळाचे पांघरूण घेण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे.

सरकारने जाहीर केलेली तातडीची मदत जलदगतीने पोहोचणे गरजेचे आहे, मात्र प्रशासनाने नुकसानीचे मोजमाप करण्यासाठी लावलेली पंचनाम्याची फुटपट्टी अद्याप संपलेली नाही.

रायगड जिल्ह्यात 3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे गावोगावी नागरिकांची मालमत्ता, फळबागांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता केंद्र शासनाच्या आंतर मंत्रालयीन पथकाचे रायगड जिल्हयात भेट दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जिल्ह्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती केंद्रीय पथकाला संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली.

केंद्रीय पथकानेही अलिबाग नागाव चौल येथील नारळ, सुपारी, घरांची, शाळांची झालेली पडझड याची पहाणी करत नुकसानभरपाईचे आश्वासन दिले

अगोदर विरोधी पक्षनेेते देवेंद्र फडणवीस यांनीही कोकणातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती

कोकणावासीयांची भेट घेऊन त्यांना मदतीचं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. पण, अद्यापही कोकणवासी मदतीच्या अपेक्षेतच आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कोकणचा दौरा केला, सरकार पूर्णपणे तुमच्या पाठिशी असल्याचं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आढावा बैठक घेऊन मदतीसाठी १०० कोटींच्या निधीची घोषणाही केली. पण, 100 कोटी रुपयांतील किती रुपये नुकसानग्रस्तांपर्यंत पोहोचणार हा खरा प्रश्न आहे.

कुणाचं घर या निसर्गाने उद्धवस्त केलंय, तर कुणाची फळबाग नष्ट केलीय. कुणाचा निवारा हिरावून घेतलाय. त्यामुळे कोकणवासी आता सरकारकडेच मदतीच्या आशेन पाहात आहे.