Sant Tukaram Maharaj Ringan: विठू नामाच्या गजरात डोळ्यांचं पारणं फेडणारं पहिलं रिंगण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 10:12 AM2019-07-04T10:12:57+5:302019-07-04T10:20:38+5:30

जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले अश्व रिंगण बेलवाडी (ता. इंदापूर) येथे गुरूवारी (4 जुलै) मोठ्या उत्साहात पार पडले.

पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांसह परिसरातील ग्रामस्थांनी हजेरी लावली होती. रिंगण सोहळ्याने भाविकांच्या डोळ्याचं पारणं फेडलं.

सणसर येथील मुक्कमानंतर तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे पहिल्या अश्वरिंगणासाठी बेलवाडी येथे ‘ज्ञानोबामाऊली-तुकाराम’ अशा जयघोषात आगमन झाले. सकाळी सात वाजल्यापासूनच रिंगणस्थळावर भाविकांनी गर्दी केली होती.

अश्व रिंगण सोहळ्याची सुरूवात अक्षय मचाले यांच्या मानाच्या मेंढ्यांचे रिंगण झाले. यानंतर टाळकरी, विणेकरी, तुळसी वृंदावन धारक महिला, झेंडेकऱ्यांचे रिंगण पार पडले.

विठू नामाच्या गजरात रिंगणासाठी धावताना अबाल-वृध्दांचे भान हरपले. वारकरी भाविकांनी रिंगण सोहळ्या दरम्यान अलिखित शिस्तबद्ध नियमांचे दर्शन घडवले.

मानाच्या अश्व रिंगणाला सुरुवात होताच उपस्थित लाखो भाविकांनी ज्ञानोबा-तुकाराम चा एकच जयघोष केला. या जयघोषाने अवघे आसमंत दुमदुमले.

अश्व पुढे जाताच त्याच्या चरणी असणारी रज भाळी लावण्यासाठी एकच झुंबड उडाली. यानंतर महिला-पुरूषांनी फुगड्यांचे फेर धरले. तर कोणी टाळ मृदुंगाच्या तालावर विठूनामाचा ठेका धरला. विठ्ठलाच्या दारी कोणी लहान-थोर नाही. या भावनेने प्रत्येकजण एकमेकांच्या पाया पडत होते.