West Bengal Election Result 2021 : त्यामुळे एकट्या ममता बॅनर्जी बलाढ्य मोदी-शाहांना पडल्या भारी, ही आहेत पाच कारणे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 03:23 PM2021-05-02T15:23:40+5:302021-05-02T15:41:30+5:30

West Bengal Election Result 2021 : देशात कोरोनाचं संकच असतानाही केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपाने पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. त्यामुळे बंगालमधील निवडणूक चुरशीची होऊन भाजपा जोरदार मुसंडी मारेल असा दावा करण्यात येत होता. मात्र प्रत्यक्षात निकालांमध्ये ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील भाजपाने दोनशेपार मुसंडी मारली आहे.

देशात कोरोनाचं संकच असतानाही केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपाने पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. त्यामुळे बंगालमधील निवडणूक चुरशीची होऊन भाजपा जोरदार मुसंडी मारेल असा दावा करण्यात येत होता. मात्र प्रत्यक्षात निकालांमध्ये ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील भाजपाने दोनशेपार मुसंडी मारली आहे. तर भाजपाला ८०-९० जागांपर्यंत पोहोचता संघर्ष करावा लागत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांच्या नेतृत्वाखालील बलाढ्य भाजपाला एकट्या ममता बॅनर्जी या वरचढ ठरल्याचे चित्र दिसत आहे. बंगालमध्ये भाजपा आणि मोदी-शाहा यांच्यापेक्षा ममता बॅनर्जी ह्या वरचढ ठरण्यामागे त्यांचा आक्रमक चेहरा, बंगाली अस्मिता असे काही मुद्दे कारणीभूत ठरल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. त्यांचा आढावा पुढीलप्रमाणे...

केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपाने पश्चिम बंगालमध्ये आपली सर्व यंत्रणा पश्चिम बंगालमध्ये कामाला लावली होती. मात्र नंदिग्राम येथे प्रचारादरम्यान ममता बॅनर्जींचे जखमी होणे आणि त्यानंतर त्यांनी व्हिलचेअरवरून आक्रमक प्रचार करणे बंगाली जनतेला भावले. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना मोठ्या प्रमाणावर सहानुभूती मिळाली.

बंगालमध्ये विजय मिळवण्यासाठी भाजपाने ध्रुविकरणाचा आधार घेतला. मात्र त्याला प्रत्युत्तर म्हणून तृणमूलने ममतांना बंगालची मुलची म्हणून पुढे आणले. त्यामुळे महिला मतदार तृणमूलकडे वळले. त्यात बंगालमध्ये भाजपाकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नव्हता. तसेच कुणी आक्रमक महिला नेताही नव्हती त्यामुळे ममतांना त्यांच्याच शैलीत उत्तर देणे भाजपाला जमले नाही. त्यातच अल्पसंख्याक विशेष करून मुस्लिमांना आपल्यासोबत ठेवण्यात ममता बॅनर्जी यशस्वी ठरल्या. त्यातच भाजपाला पराभूत करण्यासाठी मुस्लिम मतदारांनी तृणमूल काँग्रेसचा एकगठ्ठा मतदान केले. तसेच भाजपाच्या बाहेरून येणाऱ्या नेत्यांकडून ममता बॅनर्जींवर होणाऱ्या हल्ल्यांना तृणमूलने बांगला संस्कृती, बांगला भाषा आणि बंगाली अस्मितेशी जोडून भाजपाला जेरीस आणले.

भाजपाने मागासवर्गीय आणि आदिवासींना एकत्र आणून हिंदू मतांचे ऐक्य साधण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रभावशाली मातुआ समुदायाला भाजपा आपल्याकडे झुकवू शकली नाही. राजवंशी आणि अन्य समुदायंमध्येही तृणमूलने मोठ्या प्रमाणावर पकड कायम राखली. त्यासाठी विविध कल्याणकारी योजना ममता बॅनर्जींना फायदेशीर ठरल्या.

भाजपाने बंगालमध्ये ७०-३० प्रमाणात ध्रुवीकरणाची रणनीती आखली. मात्र तृणमूलच्या नेत्यांनी आणि ममता बॅनर्जींनी सावधपणे प्रत्येक सभेत भाजपा बंगालचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा आक्रमकपणे केला. ममता बॅनर्जींनी मंदिरांसोबतच मशिदींमध्येही जाण्याची रणनीती आखली. त्यामुळे कट्टर भाजपाविरोधी मतदार तृणमूल काँग्रेसकडे वळला. तसेच डावे आणि काँग्रेसच्या आघाडीकडे हा मतदार पुरेशा प्रमाणात वळला नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांनी ममता बॅनर्जींविरोधात आक्रमक प्रचार केला. मात्र या दोघांनी तसेच भाजपाच्या इतर नेत्यांनी ममता बॅनर्जींवर केलेले वैयक्तिक हल्ले भाजपावरच बुमरँग झाले. दो मई दीदी गई या सारख्या विधानांनी ममता बॅनर्जींना सहानूभुती मिळवून देण्याचे काम केले. या विधानांमुळे मतदारांमध्ये चांगला संदेश गेला नाही. याचा परिणाम तृणमूल काँग्रेसला मोठा विजय मिळण्यात झाला.