फॅशनची दुनिया सोडून निवडणुकीच्या रिंगणात उतरली उपविजेती मिस इंडिया, राजकारणाबाबत दिली अशी प्रतिक्रिया...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 04:09 PM2021-04-10T16:09:28+5:302021-04-10T16:16:57+5:30

Miss India finalist deeksha singh contesting Election : फेमिना मिस इंडिया २०१५ ची उपविजेती असलेली दीक्षा सिंह पंचायत निवडणुकीमध्ये आपले नशीब आजमावत असून, सध्या प्रचारासाठी घराघरांपासून शेतीवाडीपर्यंत जाऊन प्रचार करत आहे.

उत्तर प्रदेशमध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. दरम्यान, राज्यातील जौनपूरमधील पंचायत निवडणुकीत एक अशी उमेदवार रिंगणात उतरली आहे, जिची चर्चा सर्वत्र होत आहे.

डोळ्यांवर काळा गॉगल आणि तोंडावर मास्क लावून दीक्षा सिंह मतदारांची भेट घेत आहे. जौनपूरमधील वॉर्ड क्र. २६ मध्ये जिल्हा परिषद सदस्यत्वाची निवडणूक ती लढवत आहे. जौनपूरमधील चितौडी हे दीक्षा सिंह हिचे गाव आहे.

दीक्षा सिंह हिने आपल्या चितौडी गावाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी शपथ घेतली आहे. त्यासाठी निवडणुकीत यश मिळवण्यासाठी ती सध्या मेहनत घेत आहे.

फॅशनची दुनिया सोडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली दीक्षा राजकारणाबाबत म्हणाली की, संधी मिळाली तर मी देवाच्या आशीर्वादाने एक राजकीय पक्ष स्थापन करेन. पुढे त्याच पक्षामधून निवडणूक लढवेन. निवडणुकीच्या माध्यमातून यश मिळवून गावाच्या विकासात मोठा बदल करण्याची इच्छाही तिने व्यक्त केली आहे.

बदलांची सुरुवात सर्वप्रथम आपल्या गावापासून करायची आहे, असे तिने सांगितले. देशातील नेते हे आपले आदर्श असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद निवडणुकीत विभागातील जनता १५ एप्रिल रोजी मतदान करणार आहे. तसेच २ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीमधून दीक्षा हिला मतदारांनी कसा कौल दिला हे समोर येणार आहे.

Read in English