मध्यरात्री पंतप्रधानांचा कॉल आला अन् ५ दहशतवादी सोडले; गृहमंत्र्यांच्या मुलीचं अपहरण होतं तेव्हा...

By प्रविण मरगळे | Published: January 12, 2021 01:19 PM2021-01-12T13:19:20+5:302021-01-12T13:22:23+5:30

जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) चे प्रमुख यासीन मलिक यांच्यावर टाडा कोर्टाने ३१ वर्षापूर्वीच्या रूबिया सईद अपहरण प्रकरणात आरोप निश्चित केले आहेत. यासीन मलिकवर रुबिया सईदचे अपहरण करून दहशतवादी हल्ल्यात सामील असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सीबीआयने टाडा कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते ज्यामध्ये यासीन मलिकसह २४ आरोपींची नावे आहेत. यामध्ये बरेच जण सध्या फरार आहेत.

३१ वर्ष जुन्या अपहरणाच्या घटनेने तेव्हा देशात खळबळ माजली होती, त्या बदल्यात ५ दहशतवाद्यांना सोडावं लागलं होतं, त्यावेळी सरकारला टीकेला सामोरे जावे लागले. रुबीयाचे वडील मुफ्ती मोहम्मद सईद हे व्हीपी सिंह सरकारमध्ये गृहमंत्री होते. ती तारीख होती ८ डिसेंबर १९८९, व्ही.पी. सिंग यांना केंद्रात सत्तेत येऊन एक आठवडाही गेला नाही. दुपारी तीन वाजता मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबिया सईद ड्युटी संपल्यानंतर घरी जाण्यासाठी निघाली होती, तेव्हा एमबीबीएस पूर्ण करून श्रीनगरमधील रुग्णालयात इंटर्नशिप घेत होती. श्रीनगरच्या सरहद्दीवर लाल चौकातून नौगमकडे जाणाऱ्या एका बसमध्ये ती चढली. दहशतवादी आधीपासूनच बसमध्ये होते.

बस चाणपुरा चौकाजवळ येताच तिन्ही दहशतवाद्यांनी बस बंदुकीच्या जोरावर रोखली, रुबियाला खाली उतरवत निळ्या रंगाच्या कारमध्ये बसवून फरार झाले, घटनेच्या अवघ्या दोन तासांनंतर जेकेएलएफच्या जावेद मीर यांनी एका स्थानिक वृत्तपत्राला फोन करून भारताच्या गृहमंत्र्यांच्या मुलीचे अपहरण करण्याची जबाबदारी स्वीकारली असं सांगितलं, ही बातमी समजताच मोठा धक्का बसला.

दिल्ली ते श्रीनगर पर्यंत पोलीस ते गुप्तचर बैठका घेण्याच्या फेऱ्या सुरू झाल्या. रुबिया सोडण्याच्या बदल्यात दहशतवाद्यांनी अटकेत असलेल्या ७ दहशतवाद्यांना सोडण्याची मागणी केली. मध्यस्थीसाठी बरेच पर्याय उघडले, या संपूर्ण घटनेत ५ दिवस निघून गेले होते आणि ८ डिसेंबरपासून १३ डिसेंबर ही तारीख उजाडली होती.

१३ डिसेंबर १९८९ रोजी सकाळी दोन केंद्रीयमंत्री असलेले परराष्ट्रमंत्री इंद्रकुमार गुजराल आणि नागरी विमान वाहतूक मंत्री आरिफ मोहम्मद खान दिल्लीहून श्रीनगरला आले. त्यांच्यासमवेत तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एमके नारायणन होते. हे तिघे फारुखला अब्दुल्लाला भेटायला पोहोचले. ही अपहरण घडली तेव्हा फारुख अब्दुल्ला जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री होते.

फारुख अब्दुल्ला आणि केंद्रीय मंत्री यांच्यात वाटाघाटी सुरू झाल्या. दहशतवादी सोडण्यात फारुख अब्दुल्ला सहमत नव्हते पण शेवटी त्यांना अखेर माघार घ्यावी लागली, एका मुलाखतीत फारूक अब्दुल्ला यांनी संपूर्ण घटनेविषयी सांगितले. त्यांनी सांगितले होते की,'व्ही.पी. सिंग यांनी मध्यरात्री मला फोन करून सांगितले होते की डॉ. साब, आम्ही टीम पाठवत आहोत. कृपया रुबियाची सुटका करण्यास मदत करा. गुजराल (आयके गुजराल), आरिफ मोहम्मद खान आणि एमके नारायणन यांनी मला सकाळी ५ वाजता घरी भेट दिली.

डिसेंबर महिना होता आणि तिघेही थरथर कापत होते. मी (फारुख अब्दुल्ला) त्यांना बोलावले आणि माझे मुख्य सचिव आणि दुलत (श्रीनगरमधील तत्कालीन आयबी चीफ) यांना माहिती दिली. दुलत यांनी पंतप्रधानांना दिल्लीत जाऊन हे सांगायला हवे आणि मुलीला मुक्त करण्यासाठी मुत्सद्दी दबाव निर्माण करावा, अशी सूचना केली. यावर गुजराल म्हणाले की, नाही हा आमचा अधिकार आहे आणि फारुख अब्दुल्ला यांनी दहशतवाद्यांना सोडले नाही तर आम्ही त्यांना काढून टाकणार आहोत.

१३ डिसेंबर रोजी दुपारपर्यंत सरकार आणि अपहरणकर्त्यांमध्ये तोडगा निघाला होता. कराराअंतर्गत त्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता ५ दहशतवाद्यांना सोडण्यात आले. तासाभरानंतर साडेसात वाजता रुबियाला सुखरूप सोनवार येथील न्यायमूर्ती मोतीलाल भट्ट यांच्या घरी नेण्यात आले. त्याच रात्री रुबियाला विशेष विमानाने दिल्लीला आणण्यात आले.

मुफ्ती मोहम्मद सईद आणि त्यांची दुसरी मुलगी मेहबुबा मुफ्ती विमानतळावर हजर होते. त्याने रुबियाला मिठी मारली. या दरम्यान मुफ्ती मोहम्मद सईद म्हणाले की, वडील म्हणून मी आनंदी आहे पण नेता म्हणून मला असे वाटते की असं होऊ नये. त्याच्या चेहऱ्यावरील ताण स्पष्ट दिसत होता.

या घटनेचा मुख्य सूत्रधार अशफाक वाणी होता. ३१ मार्च १९९० रोजी सुरक्षा दलाच्या चकमकीत त्याचा मृत्यू झाला होता. अशफाक जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट अर्थात जेकेएलएफशी संबंधित होते. अपहरण होण्यापूर्वी त्यांनी मुफ्ती यांच्या घरी व रुग्णालयात रेकीही केली होती. या दहशतवाद्यांना सोडण्यात आले -1- अब्दुल हमीद शेख जो नोव्हेंबर 1992 मध्ये चकमकीत मारला गेला. 2- गुलाम नबी भट 3- जावेद अहमद जरगर 4- नूर मोहम्मद काळवाल 5-अल्ताफ बट