झंडा उंचा रहे हमारा... राष्ट्रपती अन् पंतप्रधानांकडून टीम इंडियाचं अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 05:10 PM2022-05-15T17:10:04+5:302022-05-15T17:31:42+5:30

भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने रविवारी ऐतिहासिक कामगिरी केली. थॉमस चषक स्पर्धेच्या ७३ वर्षांच्या इतिहासात भारतीय पुरुष संघाने प्रथमच पदक पटकावले आणि तेही सुवर्णपदक....

भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने रविवारी ऐतिहासिक कामगिरी केली. थॉमस चषक स्पर्धेच्या ७३ वर्षांच्या इतिहासात भारतीय पुरुष संघाने प्रथमच पदक पटकावले आणि तेही सुवर्णपदक....

थॉमस चषक ही स्पर्धा १४ वेळा जिंकणाऱ्या इंडोनेशियावर विजय मिळवून भारतीय पुरुष संघाने इतिहास घडवला. थॉमक चषक स्पर्धेतील भारताचे हे पहिलेच पदक ठरले.

भारताने उपांत्य फेरीत डेन्मार्कवर ३-२ असा थरारक विजय मिळवला होता, तत्पूर्वी त्यांनी मलेशियावर मात केली होती. उपांत्य फेरीत प्रवेश करताना भारताने कांस्यपदक पक्के केले होते, परंतु त्यांनी थेट सुवर्णपदकावर नाव कोरले.

लक्ष्य सेन, सात्विकराज रँकीरेड्डी, चिराग शेट्टीव, किदम्बी श्रीकांत, एम आर अर्जुन, ध्रुव कपिला व एचएस प्रणॉय हे या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ठरले.

आज झालेल्या अंतिम सामन्यात भारतासमोर तगड्या इंडोनेशियाचे आव्हान होते. इंडोनेशियाच्या पुरुष संघाने सर्वाधिक १४ वेळा थॉमस चषक उंचावला आहे. पण, भारतीय खेळाडूंच्या मजबूत निर्धारासमोर त्यांनी हार मानली.

भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर बॅडमिंटन टीम इंडियाचे दशभरातून कौतूक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनीही ट्विटरवरुन टिम इंडियाचं अभिनंदन केलं आहे.

टिम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखनेही या ऐतिहासिक विजयाबद्दल टिमचं अभिनंदन केलं. तसेच, भारतीय बॅडमिंटन टिमने इतिहास रचल्याचं म्हटलं आहे.

भारतीय संघाने दाखवलेला खेळ आणि कौशल्याचा आज संपूर्ण भारताला अभिमान वाटतो, टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल मी संपूर्ण संघाचे अभिनंदन करतो, असे राष्ट्रपती कोविंद यांनी म्हटलं आहे.

भारतीय संघाच्या या बॅडमिंटन विजयाचा देशभरात जल्लोष करण्यात येत असून सोशल मीडियावरही थॉमस कप 2022 ट्रेंड करत आहे.

14 वेळा चॅम्पियन राहिलेल्या इंडोनेशियाच्या संघाला पराभूत करुन टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवला, या विजयाबद्दल बॅडमिंटन संघाचे अभिनंदन असे ट्विट रितेश देशमुखने केले आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीनेही भारतीय संघाच्या या ऐतिहासिक आणि विराट विजयाबद्दल टिम इंडियाचे अभिनंदन केले आहे.