पेट्रोल-डिझेल शंभरी पार; बाबा रामदेव म्हणतात, "...तर सायकलचा ट्रेंड सुरू करा!"

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 19, 2021 04:47 PM2021-02-19T16:47:01+5:302021-02-19T16:58:44+5:30

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. एवढेच नाही, तर काही ठिकाणी पेट्रोलच्या दराने शंभरीही पार केली आहे. (Baba Ramdev on Petrol Diesel price hike)

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol, Diesel ) किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. एवढेच नाही, तर काही ठिकाणी पेट्रोलच्या दराने शंभरीही पार केली आहे. यावर आज योग गुरु बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनीही भाष्य केले आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवर बोलताना, सरकारने लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन पावले उचलायला हवी, असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.

एका खासगी वृत्त वाहिनीशी बोलताना बाबा रामदेव म्हणाले ''देश चालविण्यासाठी सरकारला रेव्हेन्यूची आवश्यकता असते. मात्र, याच वेळी सरकारने लोकांचा बीपी वाढणार नाही, याचाही विचार करायला हवा. हे सरकार एक संवेदनशील सरकार आहे. सरकार लवकरच यावर विचार करेल.''

रामदेव म्हणाले, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी म्हटले आहे, की ते इलेक्ट्रीक व्हेइकल घेऊन येत आहेत. यामुळे डिझेल पेट्रोल न वापरताही काम चलेल. तसेच लोकांनीही सायकलचा ट्रेंड सुरू करायला हवा. ऑफिस जवळपास असेल, तर सायकल वापरायला हवी. यामुळे लोक हेल्दी राहतील.

रामदेव म्हणाले, मी माझ्या आंदोलनावेळी म्हटले होते, की डिझेल आणि पेट्रोलवरील सर्व टॅक्स संपवले, तर ते 35-40 रुपये लिटर मिळेल. इतर ठिकाणांहून चांगल्या प्रकारे टॅक्स कलेक्शन झाल्यास आणि पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स कमी झाल्यास ते स्वस्त होईल.

आज सलग 11व्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली. यामुळेच मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या काही शहरांत पेट्रोल 100 रुपयांच्याही पुढे गेले आहे.

राजधानी दिल्लीत गेल्या 11 दिवसांत पेट्रोल 3.24 रुपये लिटरने महागले आहे. तर डिझेलच्या दरात 3.49 रुपये प्रती लिटरने वाढ झाली आहे.

आज दिल्लीत पेट्रोल 90.19 रुपये प्रति लिटर तर डिझेल 80.60 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

नुकतेच, पंतप्रधान मोदींनी तामिळनाडूमध्ये एन्नौर-थिरुवल्लूर-बेंगळुरू-पुदुच्चेरी-नागापट्टिनम-मदुराई-तुतीकोरिन नॅचरल गॅसच्या पाईपलाईनच्या रामनाथपुरम- थुथूकुडी खंडाचे उद्घाटन केले. यावेळी, पेट्रोल आणि डिझेलच्या या दरवाढीवर बोलताना, पूर्वीच्या सरकारांनी इंधन आयातीवरील निर्भरतेवर लक्ष दिले असते, तर आज मध्यम वर्गाला, अशा कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला नसता, असे मोदींनी म्हटले होते.

याशिवाय, सरकार मध्यम वर्गाला सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाबद्दल संवेदनशील आहे. तसेच आता भारत शेतकरी आणि ग्राहकांची मदत करण्यासाठी इथेनॉलवर लक्ष केंद्रीत करत आहे, असेही मोदी यांनी सांगिले. तसेच, ऊसापासून काढले जाणारे इथेनॉल इंधन आयात कमी करण्यास मदत करेल. तसेच शेतकऱ्यांना उत्पन्नाचे एक साधनही उपलब्ध होईल, असेही मोदी म्हणाले होते.

योग गुरू बाबा रामदेव.