पक्षांतर करून भाजपामध्ये गेलेल्या बड्या नेत्यांचं पुढे काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 03:07 PM2020-03-11T15:07:05+5:302020-03-11T15:14:44+5:30

मध्य प्रदेश काँग्रेसमधले दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांनी कालच काँग्रेस नेतृत्त्वाकडे राजीनामा सोपवला. मध्य प्रदेश सरकारमध्ये साईड लाईन करण्यात आल्यानं त्यांना पक्षाला रामराम केला. त्यांना भाजपाकडून राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय त्यांना मोदी सरकारमध्ये मंत्रिपददेखील दिलं जाऊ शकतं.

काँग्रेसचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे-पाटील गेल्या वर्षी भाजपात गेले. काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना त्यांच्याकडे विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद होतं. भाजपा सत्तेत येईल, अशी शक्यता दिसत असताना विखे-पाटील यांनी पक्ष सोडला. मात्र निवडणुकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं एकत्र येत सरकार स्थापन केल्यानं विखे-पाटील यांच्यावर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली.

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते नारायण राणे यांनी गेल्या वर्षी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपानं त्यांना राज्यसभेवर पाठवलं. मात्र अद्याप पक्षानं त्यांच्याकडे कोणतीही मोठी जबाबदारी दिलेली नाही.

राष्ट्रवादीच्या तिकीटावर २०१९ ची लोकसभा निवडणूक जिंकणाऱ्या उदयनराजे भोसले यांनी खासदार झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत राजीनामा दिला. त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. सातारा लोकसभा मतदारसंघातून झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांना भाजपानं उमेदवारी दिली. मात्र राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी त्यांचा पराभव केला.

काँग्रेसचे हर्षवर्धन पाटील यांनी गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला. मात्र इंदापूर मतदारसंघात त्यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीचे उमेदवार दत्ता भरणे यांनी त्यांना पराभूत केलं.

काँग्रेसच्या दिग्गज नेत्या रिटा बहुगुणा जोशी २०१६ मध्ये भाजपावासी झाल्या. २०१७ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक झाली. जोशी यांनी लखनऊ केंटमधून निवडणूक लढवली. जोशी यांनी मुलायम सिंह यादव यांच्या स्नुषा अपर्णा यादव यांचा पराभव केला. रिटा बहुगुणा जोशी यांना योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं. २०१९ मध्ये त्यांनी अलाहाबादमधून (आत्ताचं प्रयागराज) लोकसभा निवडणूक लढवली आणि त्या विजयी झाल्या.

ईशान्यतले काँग्रेसचे मोठे नेते हेमंत बिस्वा शर्मा २०१५ मध्ये भाजपात सामील झाले. ईशान्य भारतात भाजपा अडचणीत असताना शर्मा यांनी पक्षासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आसाम सरकारमध्ये त्यांच्याकडे अर्थ, शिक्षण आणि आरोग्य यांच्यासारख्या महत्त्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी देण्यात आली आहे.

केवळ एक दिवस उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलेले काँग्रेस नेते जगदंबिका पाल यांनी २०१४ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांनी सलग दोनवेळा डुमरियागंज लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली.

चौधरी बिरेंद्र सिंह यांनी २०१४ मध्ये काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. मोदी-१ सरकारमध्ये त्यांच्याकडे स्टील मंत्रालयाची जबाबदारी होती.

काँग्रेसचे नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा यांनी २०१७ मध्ये काँग्रेस सोडून भाजपाचं कमळ हाती घेतलं. कर्नाटकमधले प्रमुख नेते असलेल्या कृष्णा यांच्याकडे सध्या भाजपानं कोणतीही मोठी जबाबदारी दिलेली नाही.