प्रवाशांनो आता सामान हरवण्याचे टेन्शन घेऊ नका; रेल्वेने सुरू केली नवीन सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 08:31 AM2022-01-13T08:31:51+5:302022-01-13T08:46:05+5:30

Western Railway : रेल्वे नियमानुसार चोरीचा माल मिळत नसला तरी काही काळानंतर चोरीच्या मालाच्या किमतीएवढी भरपाई घेण्याचा अधिकार आहे. पण आता रेल्वेने आणखी एक नवा नियम केला आहे, ज्यामध्ये तुमचे सामान हरवले तर तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही.

रेल्वेत प्रवास करताना सामान चोरीला जाण्याची भीती लोकांना असते. चोरीच्या घटना टाळण्यासाठी प्रवासीही वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. रेल्वे नियमानुसार चोरीचा माल मिळत नसला तरी काही काळानंतर चोरीच्या मालाच्या किमतीएवढी भरपाई घेण्याचा अधिकार आहे. पण आता रेल्वेने आणखी एक नवा नियम केला आहे, ज्यामध्ये तुमचे सामान हरवले तर तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही.

आता पश्चिम रेल्वेने (Western Railway) रेल्वे संरक्षण दलाच्या (RPF) सहकार्याने 'मिशन अमानत' (Mission Amanat) सुरू केले आहे. या अभियानांतर्गत प्रवाशांना त्यांच्या हरवलेल्या सामानाचा शोध घेणे आणि ते परत मिळवणे सहज शक्य होणार आहे.

या नियमांतर्गत प्रवाशांच्या सामानासह त्यांच्या सुरक्षिततेचाही निर्णय घेतला जात आहे. हरवलेले सामान परत मिळणे सोपे व्हावे यासाठी पश्चिम रेल्वेच्या आरपीएफने एक नवीन पुढाकार घेतला असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या वतीने ट्विट करून देण्यात आली आहे.

'मिशन अमानत' अंतर्गत हरवलेल्या सामानाची माहिती फोटोंसह पश्चिम रेल्वेच्या वेबसाइटवर पोस्ट केली जाते. यासह, प्रवाशांना आरपीएफ वेबसाइट http://wr.indianrailways.gov.in वर फोटोसह हरवलेल्या सामानाची माहिती पाहता येईल.

पश्चिम रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सन 2021 मध्ये, जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत, पश्चिम रेल्वे विभागाच्या रेल्वे संरक्षण दलाने 1,317 रेल्वे प्रवाशांकडून संबंधित 2.58 कोटी रुपयांचे सामान जप्त केले. पडताळणी केल्यानंतर सामान त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले.

पश्चिम रेल्वे आरपीएफ 'मिशन अमानत' अंतर्गत 24 तास काम करते. दुसर्‍या ट्विटमध्ये पश्चिम रेल्वेने म्हटले आहे की एप्रिल 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीत तिकिटांशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 68 कोटी रुपये जमा झाले.