या आहेत भारतीय राजकारणातील 10 प्रभावी महिला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 03:36 PM2019-05-16T15:36:15+5:302019-05-16T16:10:47+5:30

भारतीय राजकारणामध्ये महिलांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. इंदिरा गांधी यांनी दीर्घकाळ देशाचे पंतप्रधानपद भूषवले होते. आजही भारतीय राजकारणावर अनेक महिला नेत्यांचा प्रभाव आहे. अशाच दहा प्रभावी महिलांचा घेतलेला हा आढावा.

सोनिया गांधी - सोनिया गांधी यांचा उल्लेख आजच्या भारतीय राजकारणातील सर्वात प्रभावशाली महिला म्हणून करण्यात येतो. सोनिया गांधींनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले असले तरी आजही त्यांचा काँग्रेसवर प्रभाव आहे.

मायावती - उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी प्रचंड संघर्ष करून राजकारणात यश मिळवले आहे. मायावतींच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्ष उत्तर प्रदेशमधील प्रमुख पक्षांपैकी एक आहे.

ममता बॅनर्जी - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांची ओळख आक्रमक नेत्या अशी आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन तृणमूल काँग्रेसची स्थापना केल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी दीर्घकाळ संघर्ष करून 2011 मध्ये पश्चिम बंगालमध्ये एकहाती सत्ता मिळवली होती. आजही ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष पश्चिम बंगालमध्ये प्रभावी आहे.

शीला दीक्षित - दिल्लीचे मुख्यमंत्रिपद दीर्घकाळ सांभाळण्याचा विक्रम शीला दीक्षित यांच्या नावावर आहे. त्या 1998 ते 2013 या काळात दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी होत्या. नेहरू-गांधी घराण्याच्या निकटवर्तीय असलेल्या शीला दीक्षित यांच्याकडे सध्या दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद आहे.

सुषमा स्वराज - भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचीही आजच्या घडीच्या सर्वात प्रभावी महिला राजकारण्यांमध्ये गणना होते. दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासह केेंद्रात विविध पदांचा कारभार पाहणाऱ्या सुषमा स्वराज यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये परराष्ट्रमंत्री म्हणून प्रभावी कामगिरी केली आहे.

वसुंधरा राजे - राजघराण्याची पार्श्वभूमी असलेल्या वसुंधरा राजे यांनी दोन वेळा राजस्थानचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. तसेच वाजपेयी सरकारच्या काळात त्या केंद्रात मंत्रिपदावर देखील होत्या. राजस्थानमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन आहे.

सुप्रिया सुळे - शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या दहा वर्षांपासून लोकसभेच्या सदस्थ असलेल्या सुप्रिया सुळे यांनी संसदेमध्ये अनेक प्रभावी भाषणे केली आहेत.

वृंदा करात - हवाई दलातील नोकरी सोडून राजकारणात आलेल्या वृंदा करात अल्पावधीतच डाव्या पक्षांमधील प्रभावी नेत्या बनल्या. 2005 मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली होती. तसेच त्यांना डाव्या पक्षांच्या पॉलिट ब्युरोमध्येही स्थान मिळाले होते.

अंबिका सोनी - अंबिका सोनी यांनी काँग्रेसकडून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. नंतर त्यांनी विविध मंत्रिपदांवर काम पाहिले होते.

सुमित्रा महाजन - भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांनी मावळत्या लोकसभेमध्ये लोकसभेचे अध्यक्षपद प्रभावीरीत्या सांभावले होते. तसेच त्या इंदूर लोकसभा मतदारसंघातून सलग नऊ वेळा निवडून आल्या होत्या.