वेळीच सावध झालो नाही तर भारतातील ‘या’ ३० शहरांवर भविष्यात येणार मोठं संकट

By प्रविण मरगळे | Published: November 4, 2020 12:05 PM2020-11-04T12:05:33+5:302020-11-04T12:08:18+5:30

भविष्यातील पाण्याची समस्या ही जगासाठी सर्वात मोठी समस्या बनू शकते. वर्ल्ड वाइड फंडाच्या अहवालानुसार जगातील १०० सर्वात महत्वाच्या शहरांमध्ये राहणाऱ्या सुमारे ३५ कोटी लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते.

संशोधनानुसार, जागतिक स्तरावर जर हवामान बदलाकडे लक्ष दिले गेले नाही आणि त्यास परिस्थितीशी जुळवून घेण्याचा त्वरित प्रयत्न झाला नाही तर भारतातील ३० हून अधिक शहरांवर पाण्याचं मोठं संकट उभं राहणार आहे.

जल संकटाचा पहिला फटका भारतातील शहरांमध्ये होणार आहे. मुंबई, बेंगलुरू, कोलकाता, जयपूर, इंदूर, अमृतसर, पुणे, श्रीनगर यासह सुमारे ३० शहरे आहेत. अहवालानुसार २०५० पर्यंत पाण्याचं मोठं संकट उभं राहिला, त्यामुळे कोट्यवधी लोकांच्या जीवनावर परिणाम होणार आहे.

पाण्याचा तुटवडा असलेल्या शहरांच्या यादीमध्ये जयपूर ३० लाख लोकसंख्येसह ४५ व्या क्रमांकावर आहे तर २० लाख लोकसंख्या असलेले इंदूर हे ७५ व्या स्थानावर आहेत.

ज्या भागात पाण्याचे संकट आता १७ टक्क्यांपर्यंत आहे तेथे २०५० पर्यंत ते ५१ टक्क्यांपर्यंत वाढू शकेल अशी भीती अहवालामध्ये व्यक्त करण्यात आली आहे.

या रिसर्च रिपोर्टमध्ये भारतातील ज्या शहरांना पाणी संकटामुळे अतिसंवदेनशील म्हटलं गेलं आहे, त्यात अमृतसर, पुणे, श्रीनगर, कोलकाता, बेंगलुरू, कोझिकोड, वडोदरा, राजकोट, कोटा, अहमदाबाद, कोलकाता, मुंबई, भोपाळ, ग्वालियर, दिल्ली, लखनौसारख्या शहरांचा समावेश आहे.

या अभ्यासानुसार, अहमदाबाद, अमृतसर, चंदीगड ही शहरे २०३० ते २०५० या काळात जलसंकटाच्या सर्वात धोकादायक भागात समाविष्ट असलेल्या शहरांमध्ये आहेत.

वर्ल्ड वाईड फंड (WWF) ही संशोधन संस्था जगभरातील कंपन्या आणि गुंतवणूकदारांना पाण्याचा तुटवडा, जलसंकट, मूल्यमापन आणि किंमतीत मदत करते.

डब्ल्यूडब्ल्यूएफचे इंडिया प्रोग्राम डायरेक्टर डॉ. सेजल वोरा म्हणाले की, भारत कशारितीने पाणीटंचाईचा सामना करत आहे आणि या शहरांचे भवितव्य काय आहे याची आता सखोल चर्चा होणे आवश्यक आहे.

दरम्यान, गोड पाण्याच्या संवर्धनाच्या योजनेसंदर्भात स्मार्ट सिटी बनविण्याच्या योजनेचेही कौतुक केले गेले आहे. विश्लेषणामध्ये असं म्हटले आहे की पाण्याचे व्यवस्थापन आणि एकूणच संरचनेचा विकास याचा समावेश आहे. ज्या पाण्याचे संतुलन राखण्यात मदत करू शकते.