गणित शिकवता शिकवता 'तो' बनला दहशतवादी; हिज्बुलच्या टॉप कमांडरचा भारतीय जवानांकडून खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 05:26 PM2020-05-07T17:26:15+5:302020-05-07T17:46:44+5:30

काश्मीर खोऱ्यातला हिज्बुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या रियाझ नायकूचा खात्मा करण्यात भारतीय सैन्याला यश आलं. हंदवाड्यात एक कर्नल, एक मेजर, दोन जवान आणि एक पोलीस कर्मचारी गमावल्यानंतर सैन्यानं हिज्बुलच्या म्होरक्याला कंठस्नान घालून बदला घेतला.

भारतीय सुरक्षा दलांनी नायकूचा समावेश ए प्लस प्लस यादीत केला होता. त्यावरुन नायकूचं दहशतवाद्यांमध्ये असलेलं स्थान समजून घेता येईल. नायकूच्या नावावर अनेक खुनाचे गुन्हे दाखल असून त्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

सामान्यपणे एका जिहादी दहशतवाद्याचं वयोमान २ ते ३ वर्षांचं असतं. याच कालावधीच भारतीय जवान त्याचा खात्मा करतात. मात्र नायूक जवळपास ८ वर्षांपासून जिहादी कारवाया करत होत्या.

सर्वसामान्यपणे दहशतवादाच्या मार्गानं गेलेले तरुण गरीब कुटुंबातले असतात. नायकू यालाही अपवाद होता. त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी गरीब नाही.

२०१०-११ मध्ये नायकू पुलवामात गणित शिकवायचा. शाळेत, महाविद्यालयात तो हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जायचा. बारावीत त्याला ६०० पैकी ४६४ गुण मिळाले होते.

नायकूला इंजिनीयरिंग करायचं होतं. अतिशय शांत स्वभावाचा नायकू दररोज नमाज अदाज करायचा. अनेकदा स्थानिक त्याला भांडणं सोडवण्यासाठीदेखील बोलवायचे.

पदवीपर्यंतच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नायकू एका खासगी शाळेत गणित शिकवू लागला. गावातल्या अनेक गरीब कुटुंबातल्या मुलांना तो मोफत शिकवायचा.

२०१० मध्ये काश्मीरमध्ये एका बोगस चकमकीविरोधात वातावरण तापलं. या चकमकीत १०० पेक्षा अधिक जण मारले गेले होते. त्यामुळे काश्मीर खोऱ्यातलं वातावरण स्फोटक झालं.

जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यावेळी क्रिकेट खेळत असलेल्या नायकूला दुखापत झाली. यानंतर नायकूनं आंदोलनांमध्ये भाग घेतला. त्यावेळी त्याला अटक झाली.

२०१२ मध्ये नायकूची तुरुंगातून सुटका झाली. यानंतर तो दहशतवादाच्या मार्गाकडे वळला. त्यानं ६ जून २०१२ रोजी हिज्बुलमध्ये प्रवेश केला.

सुरक्षा दलाच्या जवानांना कायम गुंगारा देणाऱ्या नायकूनं काश्मीर खोऱ्यात स्वत:ची ओळख निर्माण केली. त्याच्या अनेक ऑडिओ, व्हिडीओ क्लिप व्हायरल व्हायच्या.

पोलिसांच्या कुटुंबीयांचं अपहरण करुन नायकूनं दहशत निर्माण केली. त्यामुळे कित्येक पोलिसांनी नोकरी सोडली. विशेष म्हणजे बऱ्याचशा पोलिसांनी व्हिडीओ चित्रित करुन आपण राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं.

२०१६ मध्ये हिज्बुलचा काश्मीर खोऱ्यातला पोस्टर बॉय बुरहान वाणी मारला गेला. त्यानंतर झाकीर मुसाकडे हिज्बुलची जबाबदारी आली. मुसाकडून नायकूनं काश्मीर खोऱ्यात हिज्बुलचं नेतृत्व केलं.