पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८३ दिवसांनी दिल्ली सोडली; ओडिशा, पश्चिम बंगालचा पाहणी दौरा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 10:00 AM2020-05-22T10:00:15+5:302020-05-22T10:12:49+5:30

Modi West Bengal news: अम्फान चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकट्या कोलकातामध्ये १९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना येऊन हवाई पाहणी करण्याची विनंती केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटामुळे दिल्लीतच तळ ठोकला होता. जगभरात कोरोनाच्या उद्रेकामुळे त्यांचे विदेश दौरे रद्द झाले होते. मात्र, आज मोदी अम्फान चक्रीवादळामुळे झालेले नुकसान पाहण्यासाठी पश्चिम बंगालसाठी रवाना झाले आहेत.

अम्फान चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकट्या कोलकातामध्ये १९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना येऊन हवाई पाहणी करण्याची विनंती केली होती.

यावर गुरुवारी मोदींनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार असल्याचे जाहीर केले होते. आज सकाळी मोदी प. बंगालकडे निघाले आहेत.

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे मोदी तब्बल ८३ दिवसांनी दिल्ली बाहेर जाणार आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी त्यांनी २५ मार्चपासून लॉकडाऊन जारी केला होता.

मोदी आज सकाळी १०.४५ वाजता दमदम विमानतळावर पोहोचणार आहेत. त्यानंतर ते १०.५० वाजता बशीरघाटला जाणार आहेत. यानंतर मोदी ११.२० वाजता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत अम्फानमुळे प्रभावित झालेल्या भागाची पाहणी करणार आहेत.

मोदी यांनी २९ फेब्रुवारीला प्रयागराज आणि चित्रकूटचा दौरा केला होता.

अम्फान चक्रीवादळानं पश्चिम बंगालमध्ये हाहाकार माजवला असून हजारो घरांचं नुकसान झालं आहे. सहा लाख जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. अम्फानमुळे झालेल्या नुकसानाची माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.

नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यामध्ये बैठक होणार आहे. यानंतर दुपारी १.३० वाजता मोदी ओडिशाला रवाना होणार आहेत.

. 'आतापर्यंत राज्यात ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. मी आतापर्यंत असा विनाश कधीही पाहिला नव्हता. पंतप्रधानांनी पश्चिम बंगालला येऊन स्वत: परिस्थिती पाहावी,' असं आवाहन त्यांनी केलं. अम्फानमुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना अडीच लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितले होते.

यानंतर लगेचच मोदींनी ट्विट करून येत असल्याचे सांगितले होते. 'अम्फानमुळे पश्चिम बंगालमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीची दृश्यं पाहिली. या काळात संपूर्ण देश पश्चिम बंगालसोबत आहे. राज्यातील परिस्थिती सुधारण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. परिस्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत,' असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Read in English