भाजपमध्ये मोदींना पर्याय कोण? सरकारचं सर्वात मोठं अपयश कोणतं? सर्व्हेतून समोर आल्या 10 मोठ्या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 12:39 PM2022-01-21T12:39:21+5:302022-01-21T12:47:06+5:30

जर आज देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर सरकार कोण बनवणार? भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय कोण? मोदी सरकारचे तीन सर्वात मोठे अपयश कोणते? जाणून घ्या...

जर आज देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर सरकार कोण बनवणार? भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय कोण? राहुल गांधी पुढचे पंतप्रधान व्हावेत, असे किती लोकांना वाटते? आणि मोदी सरकारचे तीन सर्वात मोठे अपयश कोणते? अशा अनेक प्रश्नांवर देशातील जनतेचा मूड जाणून घेण्यासाठी इंडिया टुडे-सी व्होटरने एक सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात काही गोष्टी मोदी सरकारच्या बाजूने आल्या आहेत, तर काही गोष्टी सरकारचे टेन्शन वाढवणाऱ्याही आहेत. तर जाणून घेऊयात, सर्वेक्षणातून समोर आलेल्या 10 सर्वात मोठ्या गोष्टी...

मोदी सरकारच्या कामावर किती लोक संतुष्ट? - सर्वेक्षणात सहभागी असलेले 59 टक्के लोक मोदी सरकारच्या कामावर समाधानी आहेत, तर 26 टक्के लोक कामावर खूश नाहीत. सर्वेक्षणानुसार, 63 टक्के लोक पीएम मोदींचे काम चांगले असल्याचे मानतात, तर 15 टक्के लोक सरासरी असल्याचे म्हणतात. आणि खराब काम म्हणणारे लोक 21 टक्के आहेत.

पुढचे पंतप्रधान कोण असावेत? - पुढचे पंतप्रधान म्हणूनही तब्बल 52.5 टक्के लोकांनी नरेंद्र मोदींनाच पसंती दिली आहे. तर केवळ 6.8 टक्के लोकच काँग्रेस खासदार राहुल गांधींना पुढील पंतप्रधान म्हणून बघतात. याच बरोबर, 5.7 टक्के लोक योगी आदित्यनाथ, 3.5 टक्के अमित शाह आणि 3.3 टक्के लोकांना प्रियंका गांधी पुढील पंतप्रधान व्हाव्यात असे वाटते.

निवडणुका असलेल्या राज्यांत पंतप्रधान मोदी किती लोकप्रीय? - निवडणूक असलेल्या राज्यांमध्ये पंतप्रधान मोदींची सर्वाधिक लोकप्रियता उत्तर प्रदेशमध्ये आहे. येथे 75 टक्के लोक पीएम मोदींच्या कामावर समाधानी आहेत. दुसऱ्या क्रमांकावर मणिपूर आहे, येथे 73 टक्के लोक मोदींच्या कामावर खूश आहेत. गोव्यात 67 टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींच्या कामाची प्रशंसा काली आहे. तर, उत्तराखंडमध्ये 59 टक्के लोक मोदींच्या कामावर खूश आहेत. पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींचे रेटिंग सर्वात कमी आहे. येथे केवळ 37 टक्के लोकच त्यांच्या कामावर खूश आहेत.

राम मंदिर आणि कलम 370 किती मोठे यश? - आता अयोध्येत पुन्हा राम मंदिर उभे राहणे आणि जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटणे हे मोदी सरकारची सर्वात मोठे यश राहिलेले नाही. सर्वेक्षणात केवळ 15.7 टक्के लोकांचेच राम मंदिर हे सर्वात मोठे यश असल्याचे म्हणणे आहे. तर काश्मीरमधून कलम 370 हटणे हे सर्वात मोठे यश आहे, असे केवळ 12 टक्के लोकांनाच वाटते.

मोदी सरकारचे सर्वात मोठे अपयश? - महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे आंदोलन, हे तीन मोदी सरकारचे सर्वात मोठे अपयश असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. महागाई हे सरकारचे सर्वात मोठे अपयश ठरले आहे, कारण 25 टक्के लोकांना हा त्यांचा मुद्दा वाटतो. यानंतर, बेरोजगारी हे सरकारचे मोठे अपयश असल्याचे 14 टक्के लोकांचे म्हणणे आहे. तर 10 टक्के लोकांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सरकारचे अपयश म्हटले आहे.

सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री कौन? - ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. ओडिशातील 71 टक्के लोक त्यांच्या कामावर समाधानी आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुसऱ्या क्रमांकावर आहेत, त्यांच्या कामावर 69.9 टक्के लोक समाधानी आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 67.5 टक्के लोक स्टॅलिन यांच्या कामावर समाधानी आहेत.

भाजपचे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री कोण? - सर्वेक्षणानुसार, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे भाजपचे असे एकमेव मुख्यमंत्री आहेत, ज्यांना 50 टक्क्यांहून अधिक रेटिंग मिळाले आहे. सर्वेक्षणात हिमंता बिस्वा सरमा यांच्या कामावर 56.6 टक्के लोक खूश आहेत. गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे रेटिंग 40% च्या वर आहे. तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे रेटिंग सर्वात कमी आहे. म्हणजेच केवळ 27.2% एवढेच आहे.

मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांचा सर्वाधिक फायदा कुणाला? - बहुतांश लोकांचे मत आहे की, मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांचा सर्वाधिक फायदा उद्योगपतींना झाला आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 47.7 टक्के लोकांचे म्हणणे आहे, की एनडीए सरकारच्या आर्थिक धोरणांचा सर्वाधिक फायदा मोठ्या उद्योगपतींना झाला आहे. तर, केवळ 7.6 टक्के लोकांचे म्हणणे आहे, की छोट्या व्यावसायिकांनाही फायदा झाला आहे. सर्वेक्षणानुसार, 45 टक्के लोकांच्या मते बेरोजगारी हा देशातील सर्वात मोठा मुद्दा आहे.

भाजपत मोदींना पर्याय कोण? पंतप्रधान मोदींनंतर देशाचे गृहमंत्री अमित शाह हे सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यांच्या बाजूने 24 टक्के मते आली आहेत. 23 टक्के लोक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान मोदींचा सक्षम पर्याय मानतात. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मोदींना चांगला पर्याय असू शकतात असे 11 टक्के लोकांना वाटते.

आज लोकसभा निवडणूक झाली तर NDA ला किती मते? आज लोकसभा निवडणूक झाल्यास एनडीएच्या खात्यात 296 जागा येतील, असे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. तसेच, दुसरीकडे यूपीएच्या खात्यात 126 जागा, तर 120 जागा इतरांच्या खात्यात जाण्याचा अंदाज आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर यूपीचा विचार करता, येथे एनडीएला 67, सपाला 10, बसपाला 2 तर काँग्रेसला एक जागा मिळेल, असा अंदाज आहे.