काँग्रेसची आमदार, पण भाजपाची 'मित्र'?; थेट प्रियंका गांधींनाच केला प्रतिप्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 05:38 PM2020-05-20T17:38:42+5:302020-05-20T18:17:24+5:30

स्थलांतरित मजुरांना आणण्यासंदर्भात काँग्रेसने दिलेल्या प्रस्तावानंतर आता राजकारण पेटले आहे. आता या वादाने वेगळेच वळण घेतले आहे. भाजपा आणि काँग्रेसमध्ये जे घमासान सुरू आहे, ते तर आहेच. पण, या प्रसंगात काँग्रेसमधील आपलेच आता काँग्रेस विरोधात उभे राहिले आहेत.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या लोकसभा मतदारसंघातील रायबरेली सदरच्या आमदार अदिती सिंह यांनी ट्विट करून काँग्रेसवरच प्रश्नचिन्ह लावले आहे. त्यांनी प्रियंका गांधींचे नाव न घेताच आक्रामक अंदाजात काँग्रेसवर टीका केली आहे.

अदिती म्हणाल्या, "आपत्तीच्या काळात असल्या खालच्या दर्जाच्या राजकारणाची काय आवश्यकता, एक हजार बसेसची यादी पाठवली, त्यातही हर्ध्यावर बसेसमध्ये घोळ, 297 बसेस भंगार, 98 ऑटोरिक्षा आणि रुग्णवाहिकां सारख्या गाड्या, 68 गाड्या बिना कागदपत्रांच्या, ही कसली क्रूर थट्टा, जर बसेस होत्याच, तर त्या राजस्थान, पंजाब आणि महाराष्ट्रात का पाठवल्या नाही."

अदिती सिंह यांनी यापूर्वीही अनेक वेळा पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. यापूर्वीचीही त्यांची काही वक्तव्ये सिद्ध करतात, की त्या काँग्रेसमधील भाजपाच्या खास 'दोस्‍त' आहेत. त्यांनी अनेकदा भाजपाचे कौतुक करत काँग्रेसला मान खाली घालायला लावली आहे.

नेहमीच करतात योगींची 'तारीफ' - आणखी एका ट्विटमध्ये अदिती म्हणतात, "कोटामध्ये उत्तर प्रदेशातील हजारो मुले अडकली होती, तेव्हा कुठे गेल्या होत्या या बसेस. तेव्हा तर काँग्रेसला, या मुलांना घरी तर सोडाच, पण बार्डरपर्यंतही सोडता आले नाही. तेव्हा योगी आदित्यनाथ यांनी रात्रीतूनच बसेस करून या मुलांना त्यांच्या घरी सोडले. खुद्द राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनीही याचे कौतुक केले होते."

गेल्या वर्षी तोडला पार्टी व्हिप - गेल्या वर्षी अदिती सिंह यांनी पार्टी व्हिपच्या विरोधात जाऊन ऑक्टोबरमध्ये झालेल्या 36 तासांच्या विशेष विधानसभा सत्रात भाग घेतला होता. त्यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन अनेक विधाने केली होती.

ज्या दिवशी सरकारने हे विशेष सत्र बोलावले होते, त्याच दिवशी काँग्रेस सरचिटनीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी लखनौमध्ये शांती यात्रेचे आयोजन केले होते. त्यात अदिती उपस्थित नव्हत्या. तेव्हा काँग्रेसने त्यांना पहिली नोटिसही पाठवली होती. मात्र, अदिती यांनी त्या नोटिशीला पार केराची टोपली दाखवली. यानंतर अदिती यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी काँग्रेसने विधानसभा अध्यक्षांना पत्रही लिहिले होते.

आदितींनी घेतली योगींची भेट - विशेष विधानसभा सत्रात भाग घेतल्यानंतर लगेचच, उत्तर प्रदेश सरकारने अदिती यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली होती. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेतली. यामुळे काँग्रेस हदरली होती. त्या भाजपात प्रवेश करतात, की काय, अशा चर्चांना उधान आले होते. मात्र, तसे झाले नाही.

काँग्रेसच्या प्रशिक्षण वर्गालाही मारली होती दांडी - अदिती सिंह यांनी गेल्या वर्षी 22 ते 24 ऑक्टोबरदरम्यान रायबरेली येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण वर्गालाही दांडी मारली होती. यावेळीही काँग्रेसने त्यांना कारणे दाखवा नोटिस पाठली होती, मात्र, त्यांनी तिलाही उत्तर दिले नाही.

आर्टिकल 370 हटाविण्याचेही समर्थन - अदिती सिंह यांनी अनेकदा पक्षाविरोधात भूमिका घेतली आहे. आर्टिकल 370 हटविण्याचेही त्यांनी समर्थन केले होते.

गांधी कुटुंबाशी जवळचे संबंध - गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात त्यांचे वडील अखिलेश सिंह यांचे निधन झाले. अखिलेश सिंह हे रायबरेली सदर येथून 5 वेळा आमदार झाले आहेत. रायबरेलीमध्ये त्यांचे चांगले वजन होते आणि गांधी कुटुंबाशीही चांगली जवळीक होती. असे असताना अदिती यांचे सातत्याने पक्षाच्या विरोधात भूमिका घेणे योग्य नाही, असे काँग्रेसमधील नेत्यांना वाटते.

21 नोव्हेंबर 2019 रोजी अदिती यांनी पंजाबमधील काँग्रेसचे आमदार अंगद सिंह यांच्याशी विवाह केला.