उष्मा वाढल्यानं कुटुंबियांनी रुग्णाच्या व्हेंटिलेटरचा प्लग काढला, कूलर लावला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 12:39 PM2020-06-20T12:39:18+5:302020-06-20T12:47:10+5:30

सध्या सर्वत्र कोरोनानं कोरोनानं थैमान घातलं आहे. देशात दिवसाला तेरा हजार कोरोना रुग्ण आढळून येत आहे. देशातील कोरोना रुग्णांचा आकडा चार लाखांच्या जवळ पोहोचला आहे.

राजस्थानातील एका व्यक्तीला कोरोना झाल्याच्या संशयातून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याचा मृत्यू झाला. त्याची मृत्यूच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली आहे.

कोरोनाची लागण झाल्याचा संशय आल्यानं, तशी लक्षणं दिसू लागल्यानं ४० वर्षीय व्यक्तीला १३ जूनला महाराव भीम सिंह (एमबीएस) रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

व्यक्तीला श्वास घेण्यात अडचणी येत असल्यानं अतिदक्षता विभागात (आयसीयू) ठेवण्यात आलं. रुग्णाची कोरोना चाचणी घेण्यात आली.

सुदैवानं कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र आयसीयूमधील एक रुग्ण कोरोनाबाधित आढळून आल्यानं रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ४० वर्षीय व्यक्तीला १५ जूनला इतरत्र हलवलं.

दुसऱ्या वॉर्डमध्ये उकडत असल्यानं त्याच्या कुटुंबियांनी त्याच दिवशी तिथे कूलर आणून ठेवला.

उष्मा फार वाढल्यानं कुटुंबियांना कूलर सुरू करायचा होता. मात्र तिथे कुठेही सॉकेट दिसत नव्हतं.

त्यामुळे कुटुंबियांनी व्हेंटिलेटरचा प्लग काढला आणि तिथे कूलरचा प्लग लावला. त्यानंतर जवळपास अर्ध्या तासानं व्हेंटिलेटरमधील वीज संपली.

कुटुंबियांनी याची माहिती लगेचच डॉक्टरांना दिला. त्यांनी सीपीआरच्या माध्यमातून रुग्णाचा श्वासोच्छवास सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा मृत्यू झाला.

रुग्णाचा श्वासोच्छवास सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये रुग्णालयाचे उपाधीक्षक, नर्सिंग अधीक्षक आणि मुख्य चिकित्सा अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

वॉर्डमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जबाब दिले आहेत. मात्र दगावलेल्या मृताचे नातेवाईक सहकार्य करत नसल्याचे, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत नसल्याचं समितीनं सांगितलं. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक नवीन सक्सेना यांनी दिली.