Corona Vaccine : बापरे! लसीचा दुसरा डोस घेतल्यावरही 163 जणांना कोरोनाची लागण; 'या' राज्यात भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 04:18 PM2021-10-22T16:18:28+5:302021-10-22T16:42:57+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत आता भर पडली आहे.

कोरोनाप्रतिबंधक लसींचे 100 कोटी डोस देण्याचा ऐतिहासिक टप्पा गुरुवारी देशाने ओलांडला. अवघ्या दहा महिन्यांत भारताने ही नेत्रदीपक कामगिरी नोंदवली आहे. 16 जानेवारीपासून देशव्यापी लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली होती.

उत्तर प्रदेशात सर्वाधिक डोस देण्यात आले असून, त्यानंतर महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो. देशासाठी अत्यंत अभिमानास्पद असलेल्या या कामगिरीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी डॉ. राममनोहर लोहिया रुग्णालयात गेले. तेथील लसीकरण केंद्रात डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

भारतीय नागरिकांना 100 कोटी डोस देण्याचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेसस यांनीही भारताचे अभिनंदन केले. या संघटनेच्या आग्नेय आशिया विभागाच्या संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंग यांनीही भारताचे तसेच देशातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा आता तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 15,786 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 231 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल साडेचार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोनाचा वेग मंदावत असतानाच काही ठिकाणी मात्र गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे.

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत आता भर पडली आहे. पश्चिम बंगालमध्ये देखील दुर्गा पुजेनंतर कोरोनाचा ग्राफ दिवसागणिक वाढत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 260 नवे रुग्ण आढळून आले आहे.

लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतरही तब्बल 163 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोना नियमावलीचं पालन न केल्यामुळेच रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याचं म्हटलं जात आहे.

कोलकातामध्ये दुर्गा पूजेदरम्यान कोरोना नियमांचं पालन करण्यात आलं नाही. लोक रस्तावर गर्दी करत होते. त्यामुळेच गेल्या पाच दिवसांत नव्या रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे. यामध्ये कोरोना लस घेतलेल्या लोकांचा समावेश आहे.

कोलकाता नगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णांची संख्या गुरुवारी 260 होती. यातील 163 लोकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला होता. रुग्णांची संख्या आता दुप्पट होत असून पॉझिटिव्हिटी रेट देखील वाढला आहे.

20 ऑगस्टरोजी पॉझिटिव्हीटी रेट हा 1.6 टक्के होता. तर 20 सप्टेंबरला तो 1.9 टक्के आणि 20 ऑक्टोबरला 2.4 टक्के झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाच्या या महाभयंकर संकटात निष्काळजीपणा हा जीवघेणा ठरू शकतो. मास्क न लावणे, सोशल डिस्टंसिंग आणि नियमावलीचं पालन न करणं, काळजी न घेणं यामुळे वेगाने कोरोनाचा प्रसार होत असल्याचं समोर आलं आहे.

भारतातही सणसमारंभामध्ये निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. येत्या 3 महिन्यांत डेल्टा व्हेरिएंटचा मोठा धोका असल्याची माहितीही याआधी समोर आली आहे. तज्ज्ञांनी याबाबत लोकांना सतर्क केलं असून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. याच दरम्यान आता केंद्र सरकारकडून नवीन नियम जारी करण्यात आले आहेत.

देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाचा प्रसार कमी झाला आहे. मात्र, कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. सणसमारंभाच्या काळात पुढील तीन महिने अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन गाईडलाईन जारी केल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात अजूनही कोरोना व्हायरसची दुसरी लाट पूर्णपणे संपलेली नाही. काही राज्यांमध्ये अजूनही कोरोनाचा प्रसार कायम आहे. ज्या राज्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आले आहेत, तिथेही कोरोना प्रसाराबाबत इशारा दिला गेला आहे.

Read in English