Coronavirus : जगभरात कोरोना अलर्ट! सॅनिटायझर आणि मास्क वाटणारा रोबोट पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 04:16 PM2020-03-18T16:16:51+5:302020-03-18T16:29:34+5:30

Coronavirus : कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. केरळमध्ये रोबोट देखील लोकांना हँड सॅनिटायझर वापरण्याचा सल्ला देत आहेत.

कोरोना नावाच्या व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 7500 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक देशांनी हाय अलर्ट घोषित केला आहे.

कोरोनामुळे भारतात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. 122 भारतीयांना आणि 25 परदेशी व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी वेगवेगळया माध्यमातून जागृती केली जाते. यापासून बचावाचा मार्ग म्हणजे सतत आपले हात धुणे आणि मास्कचा वापर करणे. लोक स्वतःचा बचाव करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करत आहेत.

कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. केरळमध्ये रोबोट देखील लोकांना हँड सॅनिटायझर वापरण्याचा सल्ला देत आहेत. केरळच्या स्टार्टअप मिशनच्या माध्यमातून दोन रोबोटच्या मदतीने हे काम केलं जात आहे.

रोबोट लोकांना सॅनिटायझर आणि मास्क वापरण्याचा सल्ला देत आहेत. असिमोव रोबोटिक्सच्या मदतीने हा प्रोग्राम विकसित करण्यात आला आहे. दोन्ही रोबोट लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम करत आहेत.

एक रोबोट कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायझर आणि नॅपकिनचं वाटप करत आहे. तर दुसरा रोबोट आपल्या स्क्रीनवर याबाबतची सविस्तर माहिती देत आहे.

असिमोव रोबोटिक्सचे सीईओ आणि फाऊंडर जयकृष्णन टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अभियानात रोबोटचा वापर केल्याने लोकांचं लक्ष लगेच आकर्षित होतं.

केएसयूएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपीनाथ यांनी असे रोबोट हे विमानतळ आणि सार्वजनिक ठिकाणी लावण्याचा विचार सुरू असल्याची माहिती दिली.

चीन, इटली, अमेरिका, इराण, स्पेन आदी देशांत कोरोनाचा कहर सुरू असताना भारतातील परिस्थिती मात्र बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. त्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनेही समाधान व्यक्त केले आहे.

सध्या भारतात दुसऱ्या टप्प्यात कोरोना आहे. म्हणजेच कोरोना व्हायरस संक्रमित असलेल्या देशातून ज्या व्यक्ती भारतात आल्या आहेत त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यानंतर अनेकांना त्याचा संसर्ग होतो. सध्या भारतात बाहेरून आलेल्या लोकांना कोरोना झाला आहे. मात्र याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.

सध्या अनेक देशांमध्ये कोरोना हा वेगाने पसरला असून मृतांची संख्या देखील सातत्याने वाढत आहे. त्या देशात कोरोना चौथ्या टप्प्यात आहे. जेव्हा व्हायरस हा अत्यंत वेगाने देशात भौगोलिकरित्या पसरतो. तेव्हा तो चौथ्या टप्प्यात पोहोचतो. चीन, इटली, इराण आणि स्पेनमध्ये कोरोना व्हायरस हा चौथ्या टप्प्यात आहे.