धक्कादायक! देशात तब्बल ७,६८४ प्रकारचे कोरोना; सर्वाधिक प्रकार दक्षिण भारतात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 10:55 AM2021-02-21T10:55:43+5:302021-02-21T11:05:32+5:30

कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात नवनवीन खुलासे करण्यात येत आहे. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोना विषाणूवर मोठ्या प्रमाणात संशोधन करत आहेत. कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात भारतीय शास्त्रज्ञांनी धक्कादायक खुलासा केला आहे. हैदराबाद येथे असलेल्या सीसीएमबी या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी आपल्या संशोधनात अजब दावा केला आहे. (CoronaVirus India)

नवी दिल्ली : चीनच्या वुहान शहरातून अवघ्या देशभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात नवनवीन खुलासे करण्यात येत आहे. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोना विषाणूवर मोठ्या प्रमाणात संशोधन करत आहेत.

कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात भारतीय शास्त्रज्ञांनी धक्कादायक खुलासा केला आहे. हैदराबाद येथे असलेल्या सीसीएमबी या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी आपल्या संशोधनात अजब दावा केला आहे.

या शास्त्रज्ञांनी ६०१७ जीनोम सिक्वेन्सच्या आधारावर संपूर्ण देशभरात तब्बल ७ हजार ६८४ प्रकारचे कोरोना विषाणू असल्याचा दावा करण्यात आला आहे. यापैकी सर्वाधिक प्रकार दक्षिण भारतात आहेत, असेही सांगण्यात आले आहे.

कोरोनाच्या हजारो प्रकारांपैकी एन४४० याचा प्रादुर्भाव सर्वाधिक असल्याचे शास्त्रज्ञांकडून सांगण्यात आले आहे. तेलंगण राज्यात ९८७ आणि आंध्र प्रदेशमध्ये २९६ प्रकारचे कोरोना विषाणू मिळाल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

देशातील २२ प्रयोगशाळांमधील ३५ नमुने एकत्रित करण्यात आले. यानंतर शास्त्रज्ञांनी जीनोम सिक्वेन्सवर संशोधन केले. सीसीएमबीचे संचालक डॉ. राकेश मिश्रा यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, भारतात आता ७ हजारांहून अधिक कोरोनाचे प्रकार समोर आले आहेत.

भारतात आढळून आलेल्या कोरोनाच्या प्रकारांपैकी काही प्रकार तीव्र आणि घातक आहेत. मात्र, त्यासाठी वेगळ्या संशोधनाची गरज आहे. दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी यातील काही प्रकार कारणीभूत ठरू शकतात, असेही राकेश मिश्रा यांनी सांगितले.

एन ४४० या कोरोना प्रकाराच्या वाढत्या प्रादुर्भावाची स्थिती समजून घेण्यासाठी आणखी अभ्यासाची गरज आहे. अन्य देशातील कोरोना प्रकाराचा भारतातील प्रादुर्भाव खूपच कमी आहे. कोरोनाची परिस्थिती आणखी गंभीर होण्यापूर्वी ठोस उपाययोजना आवश्यक असल्याचे मतही राकेश मिश्रा यांनी व्यक्त केले.

आतापर्यंत ६ हजार जीनोम सिक्वेन्सचा शोध लागला आहे. मात्र, देशातील कोरोना बाधितांची संख्या एक कोटीच्या वर गेली आहे. देशभरातील जीनोम सिक्वेन्सचा अभ्यास करण्यासाठी आणखी सखोल संशोधनाची गरज आहे, असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिव्य तेज सोवपति यांनी सांगितले.

भारतात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. महाराष्ट्र, केरळ यांसह अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये परत लॉकडाऊन करण्याची दाट शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

महाराष्ट्रातील काही ठिकाणी नाइक कर्फ्यु लावण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रात होणाऱ्या परीक्षांवरही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचे सावट असल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रसार चीनमधील वुहान शहरातून प्रथम झाल्याचे समोर आल्यानंतर तब्बल एका वर्षानंतर WHO च्या तज्ज्ञांच्या पथकाला चीनने तपासणी करण्याची परवानगी दिली. वुहानमध्ये कोरोनाचे १३ प्रकार आढळून आले असून, प्राथमिक अंदाजापेक्षा ५०० टक्क्यांहून अधिक विध्वंस झाला आहे, असा दावा WHO कडून करण्यात आला आहे.

कोरोना विषाणूचा उगम चीनमधून झाल्याचे सर्व दावे चीनने फेटाळलेले आहेत. मिलान कॅन्सर इन्टिट्यूटप्रमाणे कोरोनाचा प्रसार ऑक्टोबर २०१९ मध्ये झाला. ऑक्टोबर महिन्यात इटलीमध्ये कोरोनाचे काही रुग्ण आढळून आल्याचा अंदाज या इन्स्टिट्यूटकडून व्यक्त करण्यात आला आहे.

कोरोनाची उत्पत्ती आणि प्रसाराची कारणे शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) तज्ज्ञांचे एक पथक चीनमधील वुहान शहरात तपासणी करण्यासाठी गेले होते. या पथकाने आपल्या प्राथमिक अंदाजात अतिशय धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.