India China Faceoff: मोदी सरकार चीनविरोधात मोठ्या कारवाईच्या तयारीत? 'त्या' दोन आदेशांमुळे चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 08:09 AM2020-06-29T08:09:02+5:302020-06-29T08:19:40+5:30

पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाल्यानंतर सीमावर्ती भागातील तणाव वाढला आहे. दोन्ही देशांनी सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केलं आहे.

सीमेवरील तणाव दिवसागणिक तणाव वाढत आहे. त्यातच आता जम्मू-काश्मीरच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं दिलेल्या एका आदेशामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आलं आहे.

एलपीजी सिलिंडरचा पुरेसा साठा करून ठेवण्याचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून दिले गेले आहेत.

येणाऱ्या दिवसांत श्रीनगर-जम्मू महामार्ग बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एलपीजी सिलिंडर आणण्यात अडचणी येऊ शकतात, असं आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

'भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद होऊ शकतो. त्याचा फटका एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्याला बसण्याची शक्यता आहे,' अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या आदेशात आहे.

इंधन कंपन्यांकडे असलेला साठा किमान १५ दिवसांचा असतो. पुढील महिनाभर चालू शकेल इतका साठादेखील कंपन्या करून ठेवतात. त्यामुळे अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं दिलेल्या आदेशांनंतर उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

भूस्खलन झाल्यास महामार्ग वाहतुकीसाठी बंद होण्याची आणि त्यामुळे एलपीजी सिलिंडरचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र महामार्गाची स्थिती इतकी वाईट नाही. त्यामुळे तो इतक्या मोठ्या कालावधीसाठी बंद करण्याची आवश्यकता भासणार नाही. मात्र तरीही महामार्ग बंद होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात आल्यानं काश्मीरमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

याच प्रकारचा आदेश गेल्या वर्षी जुलैमध्ये देण्यात आला होता. त्यानंतर ऑगस्टमध्ये कलम ३७० हटवण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारनं घेतला. याशिवाय बालाकोट एअर स्ट्राईकच्या आधीही अशाच प्रकारचा आदेश देण्यात आला होता.

आणखी एका आदेशामुळेही काश्मीरमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. गांदेरबलमधल्या शाळांच्या इमारती सुरक्षा दलांसाठी रिकाम्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काश्मीरमधील गांदेरबल लडाखमधील कारगिलला लागून आहे.

गांदेरबलमधील १६ शाळा, शिक्षण संस्थांच्या इमारकी रिकाम्या करण्याचे आदेश जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.

अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या कंपन्यांच्या मुक्कामासाठी शैक्षणिक संस्था उपलब्ध करून देण्यात याव्या, असं अधीक्षकांनी आदेशात नमूद केलं आहे.

गांदेरबलचं भौगोलिक स्थान अतिशय महत्त्वाचं आहे. हा भाग कारगिलच्या अगदी जवळ आहे. लडाखला जाणारा मार्ग याच भागातून जातो. त्यामुळे सामरिकदृष्ट्या या भागाचं महत्त्व मोठं आहे.