India China Faceoff : पँगाँग सरोवरातून दोन्ही देश सैन्य हटवणार, पण कुणाची जीत आणि कुणाची हार, जाणून घ्या १० मोठे मुद्दे

By बाळकृष्ण परब | Published: February 11, 2021 04:06 PM2021-02-11T16:06:15+5:302021-02-11T16:21:54+5:30

India China Faceoff: गेल्या जवळपास नऊ महिन्यांपासून पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेला तणाव आता निवळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

गेल्या जवळपास नऊ महिन्यांपासून पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेला तणाव आता निवळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पँगाँग सरोवरातून डिस्इंगेजमेंटच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबतची माहिती संसदेत दिली.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, भारताने चीनसोबतच्या चर्चेत तीन अटी ठेवल्या आहेत. पहिली दोन्ही पक्षांकडून एलएसीचे पालन व्हावे आणि त्याचा आदर व्हावा. दुसरी कुठल्याही पक्षाने जैसे थे परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करू नये. तिसरी अट म्हणजे सर्व करारांचे दोन्ही पक्षांकडून पालन व्हावे.

ज्या क्षेत्रांमध्ये तणाव आहे त्या भागामधून डिसएंगेजमेंटसाठी भारताचे हे मत आहे की, २०२० च्या फॉरवर्ड डिप्लॉयमेंट्स ज्या एकमेकांच्या जवळ आहेत. त्यांनी दूर व्हावे. दोन्ही सैन्यांनी आपापल्या मान्य झालेल्या चौक्यांवर जावे.

राजनाथ सिंह यांनी सांगितले की, सातत्याने होत असलेल्या चर्चेचे फळ म्हणून चीनसोबत पँगाँग सरोवरच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावर डिसएंगेजमेंटचा करार झाला आहे. तसेच पँगाँग सरोवरातून पूर्णपणे डिसएंगेजमेंट झाल्यानंतर ४८ तासाच्या आत सीनियर कमांडर स्तराची चर्चा व्हावी आणि उर्वरित मुद्द्यांवर तोडगा काढावा.

भारताच्या रणनीतीनुसार पँगाँग सरोवराच्या परिसरात चीनसोबतच्या डिसएंगेजमेंट करारामुळे दोन्ही पक्ष फॉरवर्ड डिप्लॉयमेंटला क्रमवार पद्धतीने कोऑर्डिनेट आणि व्हेरिफाइड पद्धतीने हटवतील. चीन आपल्या सैन्याच्या तुकड्यांना उत्तर किनाऱ्यावर फिंगर ८ च्या पूर्वेला ठेवेल. त्याच प्रमाणे भारत आपल्या सैन्याच्या तुकड्या फिंगर तीन जवळ आपल्या पर्मनंट धनसिंह थापा पोस्टवर ठेवेल.

याच प्रकारची अंमलबजावणी दक्षिण किनाऱ्यावरील परिसरातही दोन्ही पक्षांकडून केली जाईल. ही पावले परस्पर करारांतर्गत उचलली जातील. तसेच जे काही बांधकाम दोन्ही पक्षांकडून एप्रिल २०२० पासून नॉर्थ आणि साऊथ बँकमध्ये करण्यात आले ते मोडीत काढून पूर्वस्थिती निर्माण केली जाईल.

राजनाथ सिंह यांनी सांगितले की, दोन्ही देशांमधील चर्चेमधून हे निश्चित झाले आहे की, दोन्ही पक्ष नॉर्थ बँक येथे आपल्या सैन्याच्या हालचाली ज्यामध्ये पारंपरिक स्थानांवरील पेट्रोलिंगचा समावेश आहे ते काही काळासाठी स्थगित ठेवतील. लष्करी आणि राजकीय स्तरावर पुढील चर्चा होऊन तोडगा निघाल्यानंतर पेट्रोलिंग पुन्हा सुरू करण्यात येईल.

संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की, या करारांतर्गत कारवाई बुधवारपासून नॉर्थ आणि साऊथ बँक परिसरात सुरू झाली आहे. आता गतवर्षी विवाद होण्यापूर्वी असलेली स्थिती पुन्हा निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे.

यावेळी राजनाथ सिंह यांनी सभागृहाला आश्वासन दिले की, या चर्चेमध्ये भारताने काहीही गमावले नाही. त्यांनी सांगितले की, मी सभागृहाला सांगू इच्छितो की, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर डिप्लॉयमेंट्स आणि पेट्रोलिंगबाबत काही वादाचे मुद्दे आहेत. पुढील चर्चांमध्ये आमचे लक्ष त्या मुद्द्यांवर असेल.

त्यांनी सांगितले की, द्विपक्षीय करार आणि प्रोटोकॉलअंतर्गत संपूर्ण डिसएंगेजमेंट लवकरात लवकर करण्याबाबत दोन्ही पक्ष सहमत आहेत. आतापर्यंतच्या चर्चेनंतर चीनलासुद्धा भारताच्या एकात्मता आणि अखंडतेच्या रक्षणाबाबतची चांगलीच जाणीव झाली आहे. आता चीनने उर्वरित मुद्द्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा, अशी आमची अपेक्षा आहे.

दरम्यान, आपल्या भाषणाच्या सुरुवातील राजनाथ सिंह म्हणाले होते की, भारतीय लष्कराचे जवान हे प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यासाठी दुर्गमातील दुर्गम भागात पाय रोऊन उभे आहेत. भारतानेही गरजेचा विचार करून सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण भागात आपली तयारी पूर्ण केली आहे.