India China FaceOff: चीनला धक्का देण्याची तयारी; पंतप्रधान मोदी 'खास' माणसावर सोपवणार जबाबदारी?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 11:25 AM2020-07-06T11:25:44+5:302020-07-06T11:52:16+5:30

गेल्या दोन महिन्यांपासून लडाख सीमेवरील भारत आणि चीनमधील तणाव कायम आहे. आतापर्यंत तीनवेळा कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका होऊनदेखील सीमेवरील तणाव कमी झालेला नाही.

चिनी सैन्याच्या सीमावर्ती भागातील कुरघोड्या सुरूच आहेत. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडे देण्याची शक्यता आहे.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक यशस्वी करणारे डोवाल आता चिनी ड्रॅगनला कसं शांत करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार विशेष प्रतिनिधीच्या (एसआर) माध्यमातून सीमावाद सोडवण्याच्या प्रयत्नात आहे. या तंत्रानुसार अजित डोवाल त्यांचे चिनी समकक्ष असलेल्या वांग यी यांच्याशी संवाद साधतील.

वांग यी चीनचे परराष्ट्र असून ते त्यासोबतच स्टेट काऊन्सिलर पदाची जबाबदारीदेखील सांभाळतात. चीन सरकारमध्ये हे पद अत्यंत महत्त्वाचं असून त्या पदावरील व्यक्तीकडे परराष्ट्रमंत्र्यांपेक्षा जास्त अधिकार असतात.

विशेष प्रतिनिधीच्या माध्यमातून संवाद साधल्यास चिनी सैन्य मागे हटण्यास तयार होईल, अशी आशा सरकारला आहे.

लडाखमधील परिस्थितीवर डोवाल आधीपासूनच लक्ष ठेवून आहेत. पंतप्रधान मोदींनी गेल्या आठवड्यात अचानक लेहला जाण्याचा निर्णय घेतला. या दौऱ्याची योजनादेखील डोवाल यांनीच आखली होती. त्यामुळेच या भेटीची माहिती शेवटपर्यंत कोणालाही नव्हती.

चिनी सैन्याच्या कुरघोड्यांना भारतीय जवानांनी अतिशय आक्रमकपणे उत्तर दिलं आहे. यामागेदेखील डोवाल यांचीच रणनीती असल्याचं बोललं जातं.

दुसऱ्या बाजूला सीमेवर दोन्ही देशांच्या सैन्याच्या कमांडर्समध्येही चर्चा सुरू आहेत. याशिवाय परराष्ट्र मंत्र्यांमध्येदेखील संवाद सुरू आहेत.

आता हा प्रश्न विशेष प्रतिनिधीच्या माध्यमातून सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. २०१७ पासून चीनच्या परराष्ट्र मंत्री आणि स्टेट काऊन्सिलर पदांवर वेगवेगळ्या व्यक्ती असायच्या. मात्र २०१८ पासून या दोन्ही पदांची जबाबदारी एकाच व्यक्तीकडे दिली जाऊ लागली.

२०१७ मध्ये डोकलाम वाद झाला. त्यावेळी स्टेट काऊन्सिलर पदी यांग जिएची होते. त्यामुळे त्यांच्याकडे विशेष प्रतिनिधी पदाची जबाबदारी देण्यात आली होती. डोवाल यांनी त्यावेळी डोकलाम प्रश्न यशस्वीपणे हाताळला होता.