'अशी' आहे रियाज नायकूच्या खात्म्याची 'इनसाइट स्टोरी'; भुयारातून करायचा ये-जा, जवानांनी तेथेच खोदली कबर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 07:05 PM2020-05-06T19:05:12+5:302020-05-06T19:30:07+5:30

काश्मिरातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि हिज्बुल मुजाहिदीनचा टॉप कमांडर रियाज नायकूचा भारतीय जवानांनी पुलवामा जिल्ह्यातील बेगपोरा येथे झालेल्या चकमकीत खात्मा केला. रियाज नायकू A++ कॅटेगिरीतील दहशतवादी होता.

भारतीय लष्कर बऱ्याच दिवसांपासून नायकूचा शोधात घेत होते. लष्कराने त्याच्यावर 12 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. लष्कराने त्याचा खात्मा करण्यासाठी एक खास योजना आखली होती.

रियाज नायकू अत्यंत चलाख दहशतवादी होता. अशीही माहिती मिळते, की त्याने त्याच्या घरी ये-जा करण्यासाठी भूयारी मार्गही तयार केले होते. याची माहिती अत्यंत मोजक्या लोकांनाच होती. कारण त्याचा कुणावरही विश्वास नव्हता. अखेर लष्कराने स्फोट करून त्याचे घर बेचिराख केले आणि जी भुयारं त्याने जीव वाचवण्यासाठी तयार केली होती. त्यातच त्याची कबर बनली.

चकमकीनंतर 5हून अधिक तासांनी पटली ओळख - या बाबतीत लष्कराला कुठल्याही प्रकारची रिस्क घ्यायची नव्हती. त्यामुळेच रियाज नायकू मारला गेल्यानंतरही त्याची पूर्णपणे ओळख पटेपर्यंत साडे पाच तास लागले.

नायकू मारला गेल्यानंतर सर्वप्रथम त्याच्या शरीरावरच्या खुना पाहिल्या गेल्या. यानंतर पोलीस, सीआरपीएफ, लष्कर, आयबी आणि सर्वात शेवटी स्थानिक लोकांकडून त्याची ओळख पक्की करण्यात आली. यानंतरच रियाज मारला गेल्याची बातमी बाहेर आली.

सांगण्यात येते, की नायकू आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी आला होता. तो घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

काश्मिरात ​24 तासांत 4 जहशतवाद्यांना कंठस्नान सकाळी 2 वाजता संबंधित भागाला घेण्यात आले. तसेच जवळपासच्या घरांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. यात कुठल्याही नागरिकाला दुखापत झाली नाही. सकाळी 9.30 वाजता दहशतवाद्यांशी चकमक सुरू झाली. सलग चार तास चाललेल्या गोळीबारानंतर रियाज नायकूचा खात्मा झाला.

बेगपोरोमध्ये नायकूसोबत आणखी एक दहशतवादी होता. संरक्षण दलाच्या जवानांनी त्याचाही खात्मा केला. याच चकमकीनंतर दोन एके-47 आणि स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला.

बंदुकांच्या सलामीची पद्धतही नायकूनेच सुरू केली होती - 35 वर्षांचा रियाज अहमद नायकू हा दहशतवादी होण्यापूर्वी गणिताचा शिक्षक होता. त्याने पोलीस अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील लोकांचे अपहण आणि दहशतवादी ठार झाल्यानंतर बंदुकीने सलामी देण्याची पद्धत सुरू केली होती.

जेसीबी बोलावून शोधण्यात आली भुयारं - लष्कराने मंगळवारीच त्याच्या घराला घेराव घातला होता. मात्र कसल्याही प्रकारची फायरिंग झाली नव्हती. लष्कराच्या मनात तो पळून गेल्याची शंका उत्पन्न झाली होती. काही लोकांनी तो घरातून तयार केलेल्या भुयारांतून पळून गेल्याची माहिती लष्कराला दिली. यानंतर लष्कराने लगेच जेसीबी बोलावले होते.

रात्री उशिरापर्यंत सुरू होते खोदकाम - या भागात शेतांमध्ये आणि रेल्वे ट्रॅकचे खोदकाम केले गेले. येथे जमिनिखालील भुयारी मार्ग शोधण्यात आले. लष्कराने रात्री उशिरा हे खोदकाम थांबवले. मात्र या भागातील घेराव काढला नाही. अखेर, आता वाचण्याचा मार्ग नाही, हे कळल्यानंतर नायकूने सकाळी 9 वाजता गोळीबार करायला सुरुवात केली.

ओवैस हिज्बीदेखील ठार - फायरिंगला सुरुवात झाल्यानंतर लष्करानेही जबरदस्त फायरींग सुरू केली आणि एनकाउंटर सुरू झाले. अखेर दुपारच्या सुमारास नायकूचा खात्मा करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, थोड्याच वेळात ओवैस हिज्बीलादेखील कंठस्नान घालण्यात आले.

तेव्हा थोडक्यात निसटला होता नायकू सप्टेंबर 2018मध्येही नायकू पुलवामामध्ये आपल्या गावी आल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. नायकूचे गाव अवंतिपुराच्या बेगपोरामध्ये आहे.

तेव्हा लष्कराने संपूर्ण भागाचा तपास केला होता. स्थानीय लोकांनी दिलेल्या माहितीनुसार बेगपोरा येथील जामिया मशिदीजवळील एका प्लॉटवर जेसीबीने खोदकामही करण्यात आले होते. कारण त्यावेळीही तो भुयारात लपल्याची माहिती मिळाली होती. मात्र, त्यावेळी लष्कराला यश आले नव्हते. मात्र यावेळी जवानांनी नायकूचा खात्मा केलाच.