ऑनलाईन क्लाससाठी फोन नाही अन् परिसरात पूर; होडीतून शाळा गाठणाऱ्या मुलीचं राहुल गांधींकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 03:32 PM2021-09-06T15:32:22+5:302021-09-06T15:43:08+5:30

Sandhya Sahani school in boat do not have smartphone for online class : ऑनलाईन क्लाससाठी मोबाईल नसल्याने पुरात देखील होडीने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीच्या जिद्दीची गोष्ट आता समोर आली आहे.

देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गेल्या वर्षीपासून शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षण हे सुरू करण्यात आले आहे.

ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्टफोन हा अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र देशातील अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडे आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अद्यापही स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शन नाही. त्यामुळे फोन नसल्याने अशा विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागत आहे.

प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वकाही साध्य करता येतं हे सांगणारी एक कौतुकास्पद घटना आता समोर आली आहे. ऑनलाईन क्लाससाठी मोबाईल नसल्याने पुरात देखील होडीने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीच्या जिद्दीची गोष्ट आता समोर आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींनी देखील या मुलीचं कौतुक केलं आहे.

उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये राहणारी संध्या सोहनी ही विद्यार्थिनी शिक्षणासाठी अनेक अडचणींचा सामना करत आहे. संध्याला शिक्षणाची प्रचंड आवड आहे पण तिच्याजवळ ऑनलाईन शिक्षणासाठी सध्या आवश्यक असलेला स्मार्टफोनच नाही. त्यामुळे तिला अनेक समस्या येत आहेत.

संध्याला तिच्या शाळेत जाण्यासाठी रस्ताच नाही. त्यामुळेच ती बहरामपूर येथे असलेल्या आपल्या शाळेत जाण्यासाठी होडीची मदत घेते. ती स्वत: होडी चालवत तेथे जाते. कोरोना काळात शाळा, महाविद्यालये ही बंद आहे. पण काही ठिकाणी आता ती हळूहळू सुरू करण्यात येत आहेत.

विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाईन अभ्यास करण्याचा एक उत्तम पर्याय सध्या उपलब्ध आहे. पण संध्याकडे मोबाईलच नसल्याने तिला अडचण येत आहे. जेव्हा शाळा, महाविद्यालये पुन्हा सुरू झाली तेव्हा गावामध्ये पूर आला पण शिक्षणासाठी मी होडीने जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संध्याने दिली आहे.

5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या दिवशी संध्याचे हे फोटो समोर आले आहेत. राहुल गांधी यांनी देखील संध्याचं खूप कौतुक केलं आहे. कठीण काळात देखील मुलीने जिद्द सोडली नसल्याचं म्हटलं आहे. संध्याचं सर्वत्र भरभरून कौतुक केलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.