आशेचा किरण! 30 कोटी लोकांना कोरोना लस देण्यासाठी महातयारी; पोलिंग बूथसारखे "वॅक्सीन बूथ"

By सायली शिर्के | Published: November 25, 2020 04:00 PM2020-11-25T16:00:50+5:302020-11-25T16:36:47+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: तब्बल 30 कोटी लोकांना कोरोनावरील लस देण्याची तयारी केली जात आहे.

वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून रुग्णांचा आकडा तब्बल 92 लाखांवर आहे.

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 44,376 नवे रुग्ण आढळले आहेत. तर एकूण रुग्णांचा आकडा 92,22,217 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,34,699 लोकांना जीव गमवावा लागला आहे.

मास्क, सोशल डिस्टंन्सिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहे.

जगभरात कोरोनावर संशोधन सुरू असून नवनवीन माहिती समोर येत आहे. अनेक ठिकाणी चाचण्यांना यश आले आहे. केंद्र सरकारने कोरोनावरील कोणत्याही लसीला अद्याप मंजुरी दिलेली नाही. मात्र लसीकरणाची तयारी केली जात आहे.

तब्बल 30 कोटी लोकांना कोरोनावरील लस देण्याची तयारी केली जात आहे. प्राथमिकतेनुसार ही लस देण्यात येणार आहे. सर्वप्रथम हेल्थ वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स, सीनियर सिटिझन्सना लसीचा डोस देण्याची तयारी केली जात आहे.

लसीकरणासाठी नीती आयोगाने सुचवलेल्या प्लॅननुसार, निवडणुकीसाठी ज्याप्रमाणे पोलिंग बूथ तयार केले जातात. तसेच वॅक्सीन बूथ तयार केले जाणार आहेत. तेथे लसीचा डोस देण्यात येईल.

केंद्र सरकारने मंगळवारी सर्व राज्यांना यासाठी तयारी करण्यास सांगितले आहे. नीती आयोगाचे सद्स्य व्ही. के. पॉल यांनी मुख्यमंत्र्यांना एक प्रेझेंटेशन दिलं. त्यामध्ये याबाबत माहिती दिली आहे.

कोरोनाच्या लसीकरणासाठी पोलिंग बूथप्रमाणेच टीम तयार कराव्या लागतील आणि ब्लॉक लेवलवर रणनीती तयार केली जाणार असल्याचं देखील पॉल यांनी म्हटलं आहे.

आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली, महाराष्ट्र, केरळ आणि राजस्थान या चार राज्यांना यासाठी तयारी करण्यास सांगितलं आहे. कारण या ठिकाणची परिस्थिती ही थोडी चिंताजनक आहे.

चारही राज्यातमध्ये हाय पॉझिटिव्हिटी रेट आणि मृत्यूदर चिंतेत भर टाकणारा आहे. येथील रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. तसेच कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाची लस जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये येण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून देशातील प्रत्येक नागरिकाला ही लस दिली जाणार आहे. यासाठी काही टप्पे ठरविण्यात आले आहेत.

सुरुवातीला कोरोनाची लस ही आरोग्य कर्मचारी, कोरोना वॉरिअरना दिली जाणार आहे. यानंतर वरिष्ठ नागरिकांना दिली जाईल. या यादीत ज्यांची नावे असतील त्यांना एसएमएसद्वारे लसीकरणाची तारीख, वेळ आणि ठिकाण कळविले जाणार आहे.

मेसेजमध्ये लसीकरण करणारी संस्था, आरोग्य सेवकाचे नाव असणार आहे. पहिला डोस दिल्य़ानंतर दुसरा डोस कधी मिळणार याचीही माहिती एसएमएसद्वारे दिली जाईल.

जेव्हा दोन्ही डोस दिले जातील तेव्हा एक डिजिटल QR आधारित सर्टिफिकेट दिले जाणार आहे. हा लसीकरण झाल्याचा पुरावा असणार आहे. या सर्व तयारीसाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला जात आहे. यामध्ये कोरोना लसीचा स्टॉक, वितरण, लसीकरण आदी ट्रॅक केले जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तेथील कोरोनाची परिस्थिती आणि पुढील रणनीती जाणून घेतली. यावेळी उपस्थित असलेल्या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनाविरोधातील रणनीती आणि लसीकरणाबाबतची आपली भूमिका मांडली.

नरेंद्र मोदी यांनीही कोरोनावरील लसीबाबत मोठे विधान केले आहे. मोदी म्हणाले की, "कोरोनावरील लस कधीपर्यंत येईल हे याची वेळ आम्ही निश्चित करू शकत नाही. तर ही बाब पूर्णपणे शास्त्रज्ञांच्या हातात आहे."

"काही लोक याबाबत राजकारण करत आहेत. मात्र अशा लोकांना राजकारण करण्यापासून रोखता येणार नाही. कोरोनामधून बऱ्या होणाऱ्या आणि मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींचा विचार केल्यास जगातील इतर देशांच्या तुलनेत भारत चांगल्या स्थितीत आहे"

देशातील याचं श्रेय सर्वांनी एकत्र मिळून केलेल्या प्रयत्नांना जातं, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत बोलताना केलं.