कोरोना लसीचा प्रभाव नेमका किती दिवस राहतो?, भारतात झालेल्या संशोधनातून मोठा खुलासा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 04:35 PM2022-01-19T16:35:41+5:302022-01-19T16:45:13+5:30

Corona Updates India: कोरोना विरोधी लस घेतल्यानंतर तिचा प्रभाव नेमका किती दिवस राहतो? याबाबतचं एक संशोधन आता समोर आलं आहे. याची माहिती जाणून घेऊयात...

कोरोना विरोधी लस घेतल्यानंतर शरीरात निर्माण होणारी रोगप्रतिकारशक्ती नेमकी किती दिवस कोरोनाशी लढण्यास सक्षम राहते याचा अभ्यास आता भारतात करण्यात आला आहे.

भारतात करण्यात आलेल्या संशोधनानुसार लस घेतलेल्या १० पैकी ३ जणांमध्ये लसीमुळे निर्माण झालेल्या रोगप्रतिकार शक्तीचा परिणाम जवळपास ६ महिन्यानंतर संपुष्टात येतो असं दिसून आलं आहे.

हैदराबादस्थित AIG हॉस्पीटल आणि एशियन हेल्थकेअरनं मिळून कोरोना विरोधी लसीतून मिळणाऱ्या रोगप्रतिकार शक्तीबाबत संशोधन केलं. यात दोन्ही डोस घेतलेल्या एकूण १,६३६ जणांचा समावेश करण्यात आला होता.

कोरोना लसीमुळे शरीरात निर्माण होणाऱ्या रोगप्रतिकार शक्तीची माहिती जाणून घेण्याच्या उद्देशानं एक संशोधन करण्यात आलं. बुस्टर डोसची खरंच गरज कोणत्या वयोगटाला आहे याचीही माहिती यातून मिळाली आहे, असं AIG रुग्णालयाचे चेअरमन डॉ. नागेश्वर रेड्डी यांनी म्हटलं आहे.

लसीचे दोन्ही डोस पूर्ण केलेल्या नागरिकांमध्ये अँटिबॉडी स्तराची माहिती यात घेण्यात आली. समोर आलेल्या माहितीनुसार ज्या लोकांमध्ये अँटिबॉडीचं प्रमाण 15 AU/ml इतकं आढळून आलं त्यांच्यातील लसीचा प्रभाव संपुष्टात आल्याचं समजावं.

याशिवाय ज्या लोकांमध्ये अँटिबॉडीचा स्तर 100 AU/ml इतका आहे. त्यांच्यात लसीमुळे निर्माण झालेली अँटिबॉडी अजूनही आहे हे लक्षात येतं, असा अंदाज लावता येऊ शकतो. लसीकरण झालेल्या व्यक्तींच्या शरीरातील अँटिबॉडीचा स्तर किमान 100 AU/ml तरी असायलाच हवा, असंही डॉ. रेड्डी म्हणाले.

संशोधनात एकूण समाविष्ट झालेल्या १६३६ लोकांमध्ये ९३ टक्के जणांनी कोविशील्ड, ६.२ टक्के लोकांनी कोव्हॅक्सीन आणि १ टक्क्याहून कमी जणांनी स्पूतनिक-वी लस घेतली होती. यातील एकूण ३० टक्के जणांमध्ये कोरोना लसीचा प्रभाव ६ महिन्यानंतर 100 AU/Ml पेक्षा कमी असल्याचं दिसून आलं आहे

हायपर टेन्शन आणि मधुमेहासारख्या इतर गंभीर आजारांनी ग्रासलेल्या ४० वयोगटातील अधिक लोकांमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमकुवत झाल्याचं दिसून आलं आहे. तर ६ टक्के लोकांमध्ये इम्युनिटी संपुष्टात आल्याचं देखील संशोधनातून लक्षात आलं आहे.

एकंदर माहितीनुसार ज्येष्ठांच्या तुलनेत तरुणांमध्ये लसीमुळे निर्माण झालेली इम्युनिटी अधिक काळ टिकते असं दिसून आलं आहे. तर गंभीर स्वरुपाच्या व्याधींनी ग्रासलेल्या ४० पेक्षा अधिक वयाच्या लोकांमध्ये इम्युनिटी ६ महिन्यानंतर कमी होते.