Coronavirus : कोरोना हरणार, देश जिंकणार! 'या' राज्यांनी जिंकली कोरोनाची लढाई, 50 टक्क्यांहून अधिक रुग्ण झाले बरे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 03:40 PM2020-04-25T15:40:45+5:302020-04-25T16:08:45+5:30

Coronavirus : देशात कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत असताना काही राज्यांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यात यश मिळवले आहे.

कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. मात्र तरीही देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 24 हजारांहून अधिक झाली आहे. तर तब्बल 775 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र याच दरम्यान काही दिलासादायक घटना समोर येत आहेत.

कोरोनाचा कहर जगभरात वाढत असताना देशभरातून एक चांगली बातमी आली आहे. लागण झालेल्यांपैकी तब्बल 5063 जणांनी कोरोनावर मात केली असून ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत.

देशात कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत असताना काही राज्यांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यात यश मिळवले आहे. गोवा, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर, त्रिपुरा ही चार राज्ये कोरोनामुक्त झाली आहेत.

देशातील 11 राज्यांनी कोरोनावर मात केली आहे. या राज्यांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत तर काही राज्य कोरोनामुक्त झाली आहेत.

गोवा हे देशातील पहिलं कोरोनामुक्त राज्य ठरलं आहे. गोव्यात एकही कोरोनाचा रुग्ण नाही. येथे सुरुवातीला 7 रुग्ण आढळले होते. मात्र उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

अरुणाचल प्रदेशमध्ये कोरोनाचा एक रुग्ण आढळला होता. मात्र त्याने कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे.

मणिपूरमध्ये सध्या कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. दोन रुग्ण आढळले असून त्यांच्यावर यशस्वीपणे उपचार करण्यात आले आहेत.

त्रिपुरामध्ये कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले होते. या दोन्ही रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आता या दोघांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्रिपुरा हे राज्य आता कोरोनामुक्त झालं आहे.

छत्तीसगड जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू झाला नाही. येथे 36 रुग्णांपैकी 30 जण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हरियाणामध्ये आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण 272 रुग्ण आढळले होते. 156 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

अंदमान निकोबारमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 22 होती. त्यापैकी 11 पूर्णपणे बरे झाले आहेत.

केरळमध्ये 450 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले होते. त्यापैकी 311 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून त्यांना डिस्चार्ज दिला आहे.

आसाममध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 36 होती आणि त्यापैकी 19 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.

देशात काही अशी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे.

नागालँड आणि सिक्कीम या राज्यात कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. दिव दमण, दादरा आणि नगर हवेली, लक्षदीप या केंद्रशासित प्रदेशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही.

जगभरात कोरोनाने थैमान घातलं असून कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 197,400 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर कोरोनाग्रस्तांची संख्या 28 लाखांवर पोहोचली आहे.