LockDown 4.0 : आज जे घडणार आहे, आपला देश कधीही विसरणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 01:33 PM2020-05-18T13:33:15+5:302020-05-18T13:42:20+5:30

CoronaVirus LockDown 4.0 कोरोनाच्या वाढलेल्या आकड्यांमुळे सरकारच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. दोन महिन्यांपूर्वी सुरुवातीला १ नंतर दोन, तीन करता करता काल, रविवारी तब्बल ५००० रुग्ण एकाच दिवशी सापडले. हा आकडा वाढायला इतर देशांच्या तुलनेत वेळ लागला असला तरीही हृदयाचा ठोका चुकविणारा आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कमी लक्षणे असणाऱ्या रुग्णांना घरी पाठविण्याची परदेशातली पद्धत जरी सुरु केली असली तरीही गेल्या काही दिवसांपासून नवीन रुग्णांचे जे आकडे येत आहेत ते धक्कादायक आहेत.

कोरोनाच्या या आकड्यांमुळे सरकारच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. दोन महिन्यांपूर्वी सुरुवातीला १ नंतर दोन, तीन करता करता काल, रविवारी तब्बल ५००० रुग्ण एकाच दिवशी सापडले. हा आकडा वाढायला इतर देशांच्या तुलनेत वेळ लागला असला तरीही हृदयाचा ठोका चुकविणारा आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आता केंद्रीय नेते, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्याला कोरोनासोबतच जगणे शिकावे लागणार असल्याचे सांगितले आहे.

रविवारच्या विक्रमी ५००५ रुग्णांच्या सापडण्यामुळे देशातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा एकूण आकडा ९६ हजारावर जाऊन पोहोचला आहे.

सध्या ९६१६९ एवढे कोरोनाचे एकूण रुग्ण सापडले आहेत. कालच्यासारखीच आजही आकडेवारी वाढली तर आज किंवा उद्या हा आकडा थेट लाखावर जाऊन पोहोचणार आहे.

गेल्या दोन महिन्यांतील हा वाढलेला आकडा आणि लाखाचा टप्पा देश कधीच विसरू शकणार नाही.

शनिवारी कोरोना संक्रमनाचे ४८८५ नवे रुग्ण सापडले होते. त्या आधी शुक्रवारी ३७८७ रुग्ण सापडले होते. हा दिवस तर आपल्यासाठी धक्का देणारा होता.

कारण या आकडेवारीने आपल्याला चीनच्याही पुढे नेऊन ठेवले होते. ही एकंदरीत वाढती आकडेवारी पाहता आज किंवा उद्या देशात लाखावर कोरोनाचे रुग्ण होणार आहे.

गेल्या आठ दिवसांत ३५०० च्या खाली नव्या रग्णांचा आकडा गेलेला नाही. यामुळे आज जर पुन्हा एवढ्याच सरासरीने रुग्ण सापडले तर उद्या कोरोनाग्रस्तांचा आकडा १ लाखाचा टप्पा पार करणार आहे.

जर आज ४००० च्या आसपास रुग्ण सापडले तर आजच १ लाखाचा टप्पा ओलांडला जाणार आहे. महत्वाचे म्हणजे आजपासून देशभरात लॉकडाऊन ४ सुरु झाले आहे. गेल्यापेक्षा या टप्प्यामध्ये आणखी काही दुकाने, कंपन्या किंवा व्यवहारांना सूट देण्यात आली आहे.

आज पर्यंत ९६१६९ एवढे रुग्ण देशात सापडलेले असले तरीही ३६८२३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर ३०२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सध्या देशात एकूण ५६३१६ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु आहेत. यापैकी केवळ २ टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

देशाला सर्वाधिक फटका मुंबईने दिला आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात देशाच्या जवळपास ३० ते ४० टक्के रुग्ण सापडत आहेत.

Read in English