CoronaVirus News : कोरोनाचा धोका कायम! 100 दिवसांच्या आत पुन्हा होतेय लागण, तज्ज्ञांचा खुलासा

By सायली शिर्के | Published: October 14, 2020 12:02 PM2020-10-14T12:02:09+5:302020-10-14T12:32:31+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात कोरोनाचा दुसऱ्यांदा संसर्ग होण्याची माहिती मिळत आहे. तसेच देशात दुसऱ्यांदा संसर्ग झाल्याचे तीन रुग्ण आढळून आले आहेत.

देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी कोरोनाचा वेग मंदावताना दिसत असला तरी नव्या रुग्णांची वाढणारी संख्या चिंतेत भर टाकत आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 72,39,390 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 63,509 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 730 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,10,586 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच चिंताजनक माहिती समोर आली आहे. कोरोनाची पुन्हा लागण होत असल्याची माहिती मिळत आहे.

देशात कोरोनाचा दुसऱ्यांदा संसर्ग होण्याची माहिती मिळत आहे. तसेच देशात दुसऱ्यांदा संसर्ग झाल्याचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना दुसऱ्यांदा संसर्ग होण्याचा कालावधी 100 दिवस निश्चित करण्यात आला आहे.

कोरोनाचा संसर्ग झालेला एखादा रुग्ण बरा झाल्यानंतर त्याला 100 दिवसांनंतर पुन्हा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आहे अशी माहिती आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव यांनी दिली आहे.

बलराम भार्गव यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनाचा पुन्हा संसर्ग होण्यासाठी 100 दिवसांचा कालावधी लागत आहे. हा कालावधी म्हणजे अँटिबॉडीजचं जीवनमान आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. हाँगकाँगमध्ये याआधी अशा केसेस समोर आल्या होत्या. त्यानंतर आता भारतात आल्या आहेत.

आम्ही आयसीएमआरचा डेटा तपासत आहोत. तसेच पुन्हा संसर्ग झालेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांच्याशी फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहोत असं देखील भार्गव यांनी म्हटलं आहे.

आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, 45 ते 60 वयोगट असणाऱ्यांमध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण 35 टक्के आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने उच्चांक गाठल्यानंतर आता ऑक्टोबर महिन्यात मात्र सलग दिलासा देणारी आकडेवारी समोर येत आहे.

कोरोना संसर्ग झालेल्यांच्या संख्येत घट होताना पाहायला मिळत आहे. 1 ऑक्टोबरनंतर देशातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या 80 हजारांच्या पुढे गेलेली नाही. येत्या काळातही हेच चित्र राहिल्यास लवकरच कोरोना रुग्णांची संख्या घटत जाईल.

कोरोना चाचण्यांची संख्या 8 कोटी 78 लाखांवर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार 11 ऑक्टोबर रोजी 9,94,851 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे देशातील कोरोना चाचण्यांची एकूण संख्या आता 8,72,093 झाली आहे.

देशामध्ये दररोजच्या रुग्णवाढीचा आकडा उतरणीला लागला असून, गेल्या सलग नऊ दिवसांपासून कोरोना बळींची संख्याही एक हजारहून कमी आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.

कोरोनाच्या संख्येत थोडासा दिलासा मिळाला असला तरी देशातील चार राज्यांनी चिंतेत भर टाकली आहे. या राज्यात कोरोनाचा वेग वाढला असून रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.

कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल आणि राजस्थान या राज्यांत कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. केरळ आणि कर्नाटकमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. देशभरात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. मात्र रुग्णांच्या आकडेवारीनुसार काही राज्यांमध्ये ते आणखी वाढवण्याची गरज आहे.