CoronaVirus Live Updates : बापरे! 1 कोरोना रुग्ण तब्बल 406 जणांना करू शकतो संक्रमित; दुसरी लाट धोकादायक, प्रशासनाच्या चिंतेत भर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 09:13 AM2021-03-28T09:13:05+5:302021-03-28T09:34:45+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत असताना दुसरीकडे देशात ही कोरोनाचा वेग सध्या वाढताना दिसत आहे.

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही तब्बल 12 कोटींवर पोहोचली आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काही ठिकाणी कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन अनेक ठिकाणी पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात येत आहे. सातत्याने वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. लोकांच्याही मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत असताना दुसरीकडे देशात ही कोरोनाचा वेग सध्या वाढताना दिसत आहे. काही ठिकाणी भयावह परिस्थिती निर्माण होत आहे. गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल एक कोटीवर पोहोचली आहे. तर दीड लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे विविध उपाय केले जात आहेत.

देशात कोरोना संसर्गाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा संसर्ग आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत मे 2020 पेक्षा आता वाढ होत आहे.

एक कोरोना संक्रमित व्यक्ती कोणत्याही निर्बंधाशिवाय 30 दिवसांत सरासरी 406 लोकांना संक्रमित करू शकतो. मे 2020 नंतर कोरोनाचा संसर्ग आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या साप्ताहिक घटनांमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली आहे.

केंद्र सरकारने 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची कोरोनासंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. त्याअंतर्गत राज्यांमधील कोरोना तपासणीची संख्या वेगाने वाढविण्यासाठी आणि कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी कडक कारवाई करण्यास सांगितले गेले आहे.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, अशा 46 जिल्ह्यांकडे अधिक लक्ष देण्यात आले आहे ज्यात या महिन्यात संक्रमणाच्या एकूण प्रकरणांपैकी 71% आणि या प्रकरणांमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या 69% टक्के नोंदविण्यात आली आहेत.

आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव अधिक आहे. देशात मागील एका आठवड्यात आढळून आलेल्या प्रकरणांपैकी 59.8 टक्के रुग्ण याच जिल्ह्यांमधील आहेत असं म्हटलं आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली 12 राज्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव (आरोग्य व कुटुंब कल्याण) तसंच सर्वाधिक कोरोना रुग्ण आणि मृत्यू नोंदवल्या गेलेल्या 46 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांची उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली.

महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, तामिळनाडू, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, जम्मू कश्मीर, कर्नाटक, पंजाब आणि बिहार या राज्यांसाठी आणि केंद्र शासित प्रदेशांची बैठक घेण्यात आली.

बैठकीत प्रभावित जिल्ह्यांतील स्थितीचा आढावा घेण्यात आला. यानुसार जवळपास 90% मृत्यू हे 45 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्यांचे झाले आहेत. यात असंही समोर आलं आहे, की 90% लोकांना संसर्गाबद्दलची माहिती असतानाही मास्क केवळ 44% लोकच वापरतात.

मंत्रालयाने एक कोरोना रुग्ण 30 दिवसात 406 लोकांना बाधित करू शकतो असं म्हटलं आहे. तसेच लोकांचा निष्काळजीपणा हा कोरोना संसर्गासाठी अधिक कारणीभूत ठरताना दिसता आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोना व्हायरसबाबत संशोधनातून सातत्याने नवनवीन माहिती समोर येत आहे. कोरोनामुळे दीर्घकाळ आजारी असणाऱ्या रुग्णांनी आजारावर मात केल्यानंतरही त्यांना काही शारीरीक समस्यांना सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता आहे.

कोरोनाबाधितांना छातीत दुखणे, स्ट्रोक येणे आणि रक्ताच्या गाठी तयार होण्याचे आजार होऊ शकतात. व्हायरसवर मात केल्यानंतरही त्यानंतर शरीरावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी 30 तज्ज्ञांनी संशोधन केले. रिसर्चमध्ये हा खुलासा करण्यात आला आहे.

कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधकांनी आपल्या रिसर्चमध्ये दीर्घकाळ कोरोनाबाधित असणाऱ्यांना फुफ्फुसात रक्ताच्या गाठी जमण्यासह अन्य काही त्रास होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.

रिसर्चमध्ये संशोधकांनी ज्या रुग्णांमध्ये दीर्घकाळ कोरोनाची लक्षणे दिसली, त्यांच्यात याआधी आरोग्याशी संबंधित काहीतरी आजार होते हे देखील स्पष्ट केलं आहे. तसेच कोरोनाशी कसा संबंध आहे हे सांगितलं आहे.

कोलंबिया विद्यापीठाच्या इलेन वाय वॅन यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही तरूण रुग्णांमध्ये कोरोनाच्या संसर्गानंतर त्यांच्या हृदयाचे ठोके हे जलदगतीने पडत असल्याचं आढळून आलं आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संसर्गानंतर हृदयाच्या ठोक्यांची गती थांबणे, स्ट्रोकही येऊ शकतो. हा त्रास कोरोना झाल्यानंतर होण्याची शक्यता असल्याची माहिती संशोधक एनी नलबांदियन यांनी दिली आहे. काही रुग्णांना संसर्गानंतरही अंगदुखी होण्याचा त्रास जाणवू शकतो असंही म्हटलं आहे.

तज्ज्ञांनी कोरोनानंतर आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी नियमित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. कोरोनावर मात करणाऱ्यांनी आपल्या आरोग्याबाबत अधिक सतर्क असले पाहिजे असं म्हटलं आहे.