CoronaVirus Live Updates : भयंकर! ऑक्सिजन अभावी तडफडत होते रुग्ण पण डॉक्टर वाचवू शकले नाहीत त्यांचा जीव; 12 जणांच्या मृत्यूने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 02:38 PM2021-04-18T14:38:18+5:302021-04-18T14:50:07+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : अनेक रुग्णालयांना ऑक्सिजनच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे.

कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. रुग्णसंख्येने पुन्हा एकदा रेकॉर्ड मोडला आहे.

देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 2,61,500 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,501 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या एक कोटी 47 लाखांवर पोहोचली आहे. कोरोनामुळे देशात तब्बल 1,77,150 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

रविवारी (18 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,61,500 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,47,88,109 पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा एक लाख 77 हजारांवर पोहोचला आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 18,01,316 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,28,09,643 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय करण्यात येत आहेत.

मध्य प्रदेशच्या शहडोलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अनेक रुग्णालयांना ऑक्सिजनच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. ऑक्सिजनची कमतरता दूर झाल्याचा दावा शिवराज सिंह चौहान सरकार करत आहे. पण या घटनेने सरकारचा दावा फोल ठरला आहे.

शहडोलच्या जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन अभावी कोरोनाच्या 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात ऑक्सिजन अभावी रुग्ण तडफडत होते पण प्रयत्न करूनही डॉक्टर त्यांचा जीव वाचवू शकले नाहीत. 12 जणांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे.

गेल्या 24 तासांत ऑक्सिजन अभावी 12 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑक्सिजन सिलिंडर संपल्याने मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. ऑक्सिजनचा तुटवडा नव्हता तर ऑक्सिजनचे प्रेशर कमी झाले होतं असं म्हटलं आहे.

आयसीयूमध्येही अनेक रुग्ण आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा असता तर आणखी मृत्यू झाले असते. ऑक्सिजनचा तुटवडा आहे. पण उपलब्ध ऑक्सिजनच्या माध्यमातून रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन दिला जात आहे असा दावा रुग्णालयाने केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

एका कोरोना रुग्णालयाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला. या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. आयसीयू (ICU) मध्ये भीषण आग लागली आहे. आग लागली त्यावेळेस जवळपास 50 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती मिळत आहे.

कोरोनामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीतही जागा मिळत नसल्याचं भीषण वास्तव आता समोर आलं आहे. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांच्या मृतदेहांवर पार्किंगमधील जमिनीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे.

दिल्लीतील सीमापुरी स्मशानभूमीत हे धक्कादायक चित्र पाहायला मिळालं आहे. पार्किंगमध्येच आतापर्यंत पंधरा जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सतत मृतदेह जळत असल्यानं स्मशानभूमीमधील फरशी आणि प्लेटदेखील खराब झाल्या आहेत.

दक्षिण पूर्व दिल्ली पोलिसांसाठी एका तज्ज्ञाने (Expert) तयार केलेल्या रिपोर्टनुसार, कोरोना विषाणूची दुसरी लाट अजून 100 दिवस कायम राहू शकते. तसेच 70 टक्के कोरोना लसीकरण अत्यावश्यक असल्याचं देखील म्हटलं आहे.

कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन पूर्वीच्या कोरोना व्हायरसपेक्षा अधिक संक्रामक आहे. त्यामुळे ज्या लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. अशा लोकांनाही कोरोना व्हायरसचा पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता आहे.

कोरोनाचा हा व्हायरस आरटी-पीसीआर सारख्या चाचण्यांमध्ये देखील सापडत नाही. तथापि, वास न येणं कोरोनाची लागण झाल्याचं एक लक्षण आहे. कोरोना विषाणूची दुसरी लाट 100 दिवसांपर्यंत टिकू शकते.