CoronaVirus Live Updates : बापरे! कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतरही तब्बल 40 डॉक्टर्स पॉझिटिव्ह; परिस्थिती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 04:33 PM2021-04-07T16:33:56+5:302021-04-07T16:54:07+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स, आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी रुग्णांची अहोरात्र सेवा करत आहेत.

देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,28,01,785 वर पोहोचला आहे.

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,15,736 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 630 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,66,177 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय करण्यात येत असताना कोरोना लसीकरणाचा वेग देखील वाढवण्यात आला आहे. मात्र तरी देखील झपाट्याने रुग्णांचा आकडा वाढत आहे.

कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स, आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी रुग्णांची अहोरात्र सेवा करत आहेत. कुटुंबीयांपासून दूर राहून ते आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. मात्र याच दरम्यान अनेकांना कोरोनाची लागण झाली असून काहींचा तर मृत्यू देखील झाला आहे.

कोरोनाबाबत रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. याच दरम्यान आता पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. लखनऊमध्ये कोरोनाचा विस्फोट झालेला पाहायला मिळत आहे.

गेल्या सहा दिवसांत सहा हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तसेच कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतरही तब्बल 40 डॉक्टर्स पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.

लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल यूनिव्हर्सिटी (KGMU) चे कुलपती डॉ विपिन पुरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच केजीएमयूचे डॉ. हिमांशु यांच्यासह 40 डॉक्टरांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

कुलपतींसह सर्व डॉक्टरांनी कोरोना लसीचा दुसरा डोस देखील घेतला होता. यामध्ये सर्जरी विभागाच्या 20 डॉक्टरांचा समावेश आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी 58 टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहे. तर मृत्यूचीही संख्याही मोठी आहे. केंद्रीय आरोग्य सचिन राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत देशातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली आहे.

"देशात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेल्या पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांचा समावेश आहे. एक जिल्हा कर्नाटकातील आहे. तर छत्तीसगड आणि दिल्लीतील एका जिल्ह्याचा टॉप टेनमध्ये समावेश आहे" अशी माहिती राजेश भूषण यांनी दिली आहे.

"पंजाब आणि छत्तीसगढमध्ये वाढती मृत्यूसंख्या चिंतेची बाब आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी 58 टक्के उपचाराधीन रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. तर मृत्यूचं प्रमाण 34 टक्के आहे. महाराष्ट्रात गेल्या काही आठवड्यांपासून आरटी-पीसीआर चाचण्या घटल्या आहेत."

"आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला आरटी-पीसीआर चाचण्या वाढवण्याचा सल्ला दिला आहे. सध्या फक्त 60 टक्के आरटी-पीसीआर चाचण्या महाराष्ट्रात होत असून, त्या 70 टक्क्यांच्या पुढे घेऊन जाण्याचं राज्य सरकारला सांगण्यात आलं आहे" असं देखील भूषण यांनी सांगितलं आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे विविध उपाय केले जात आहेत. तर कोरोनामुळे देशात दीड लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी मोठं पाउल उचललं आहे. केंद्राने उच्चस्तरीय 50 वैद्यकीय टीम तयार केल्या आहेत.

कोरोनाचां संसर्ग वेगाने होत असलेल्या भागांमध्ये या टीम पाठवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाबमधील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राने 50 टीम तयार केल्या आहेत. या अतिशय उच्च स्तरीय टीम आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी टीम राज्यांना सहकार्य आणि मदत करतील. यामध्ये 30 टीम महाराष्ट्र, 11 टीम छत्तीसगड आणि 9 टीम या पंजाबमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून असणार आहेत.

देशात वेगाने लसीकरणाची मोहीम सुरू असून आतापर्यंत लाखो लोकांनी कोरोना लस घेतली आहे, संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. पण तरीही कोरोनाचा ग्राफ वाढत आहे.