CoronaVirus Live Updates : आशेचा किरण! महाराष्ट्र, दिल्लीसह 18 राज्यांत कमी होतोय कोरोनाचा कहर पण 'या' राज्यांमुळे चिंतेत भर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 08:29 AM2021-05-12T08:29:39+5:302021-05-12T10:27:51+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला असून दोन लाख लोकांना आतापर्यंत कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला असून दोन लाख लोकांना आतापर्यंत कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असून अनेकांनी त्यावर यशस्वीरित्या मात केली आहे. याच दरम्यान दिलासादायक माहिती समोर आली आहे. देशात कोरोनाचा वेग थोडा मंदावताना पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र दररोज तीन लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. याच दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलासा देणारी माहिती दिली आहे.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि दिल्लीसह देशातील एकूण 18 राज्यांमधील कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. तसंच देशाचा पॉझिटिव्हिटी दर सरासरी 21 टक्के इतका आहे.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, छत्तीसगड, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, तेलंगणा, चंदीगड, लडाख, दीव-दमण, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार यांचा या 18 राज्यांमध्ये समावेश आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी दिली.

कोरोनाचा वेग मंदावत असताना काही राज्यांमध्ये मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. नव्या रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, ओडिशा, पंजाब, आसाम, जम्मू-काश्मीर, गोवा, हिमाचल प्रदेश, पुदुच्चेरी, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, नागालँड, आणि अरुणाचल प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे.

देशातील 13 राज्यांमध्ये 1 लाखाहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. 6 राज्यांमध्ये 50 ते 1 लाखांवर सक्रिय रुग्ण आहेत. आणि 17 राज्यांमध्ये 50 हजारांवर सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

18 राज्यांमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी होत असल्याने देशाचा पॉझिटिव्हिटी दर हा कमी होत असल्याचे संकेत आहेत. हा दर आता 21 टक्क्यांवर आला आहे, अशी माहिती आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिली.

27 एप्रिलपासून देशाच्या पॉझिटिव्हिटी दरात घट दिसून येत आहे. देशातील 734 जिल्ह्यांपैकी 310 जिल्ह्यांमध्ये अजूनही पॉझिटिव्हिटी दर हा 42 टक्क्यांवर आहे. पण देशाचा एकूण सरासरी दर हा आता 21 टक्क्यांवर आला आहे, असं भार्गव म्हणाले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी (11 मे) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 3,29,942 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,876 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2,29,92,517 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 2 लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होताना पाहायला मिळत आहे.

देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग कमी होताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 37,15,221 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,90,27,304 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका निर्माण झाला आहे. रुग्णांची आणि मृतांची संख्या सातत्याने वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. याच दरम्यान एक धक्कादाक माहिती समोर आली आहे. 20 दिवसांत 26 प्राध्यापकांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशमधील अलिगढ येथे असलेल्या अलिगढ मुस्लीम विद्यापीठामध्ये गेल्या 20 दिवसांमध्ये 26 प्राध्यापकांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. मोठ्या संख्येने प्राध्यापकांचा मृत्यू झाल्याने विद्यापीठात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विद्यापीठाचे कुलगुरू तारीक मनसुर यांच्या भावाचाही गेल्या आठवड्यामध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

तारीक यांनी इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चला (आयसीएमआरला) लिहिलेल्या पत्रामध्ये विद्यापीठातील कोरोनाग्रस्त व्यक्तींच्या चाचण्या करुन येथील व्यक्तींना संसर्ग झालेल्या कोरोना विषाणूच्या जीनोम सिक्वेन्सचा अभ्यास करुन विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटसंदर्भात जी चर्चा सुरू आहे त्याबद्दल संशोधन करावं अशी मागणी केली आहे.