Coronavirus: हनीमुनच्या रात्रीच नवरदेवाला ताप आला; लग्नाच्या ७२ तासानंतर कोरोनामुळे जीव गमावला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 08:02 PM2021-04-30T20:02:29+5:302021-04-30T20:06:53+5:30

Coronavirus: देशात कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. या लाटेत अनेकांच्या जवळची माणसं हे जग सोडून जात असल्याने कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत.

देशभरात कोरोना महामारीनं हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. यातच अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा आणि बेड्स उपलब्ध न झाल्याने अनेकांचे जीव गेले आहेत.

उत्तर प्रदेशाच्या बिजनौरमध्ये कोरोनामुळं ७२ तासांत नव्या नवरीच्या आनंदावर विरजन पडलं आहे. कोरोनामुळे नुकत्याच झालेल्या नवऱ्याचा मृत्यू झाला आहे. लग्नाच्या २ दिवसातच नवऱ्याचा मृत्यू झाल्यानं नवरीवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

ज्या दिवशी लग्न झालं त्याच दिवशी नवऱ्याला ताप आला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेलं. त्याच्यावर उपचार सुरू असताना तिसऱ्या दिवशी नवरदेव अर्जुनची प्राणज्योत मालवली

बिजनौर शहराच्या मोहल्ला जाटानचा रहिवाशी अर्जुनचं लग्न २५ एप्रिल रोजी चांदपूरच्या कस्बा स्याऊ येथील बबलीसोबत झालं होतं. २५ तारखेला अर्जुनचं वऱ्हाड वाजतगाजत स्याऊ येथे गेले. दिवसभर वऱ्हाडाच्या आनंदात लग्नाचे विधी पार पडले. संध्याकाळी ७ च्या दरम्यान नवरीच्या घरच्यांनी वऱ्हाडी मंडळीना निरोप दिला.

बिजनौर येथे आल्यानंतर अर्जुनच्या घरच्यांनी वरात काढली आणि मोठ्या जल्लोषात सूनेचं स्वागत केले. परंतु त्याच रात्री नवरदेव अर्जुनला अचानक ताप आला आणि त्याचा ताप थांबण्याची चिन्हे दिसत नव्हती.

रात्री तब्येत खालावल्याने अर्जुनला तातडीने जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नेलं. याठिकाणी अर्जुनची कोविड १९ ची चाचणी करण्यात आली तेव्हा तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं.

अर्जुनला जिल्ह्याच्या कोविड रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं. मात्र उपचारानंतरही अर्जुनच्या तब्येतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. तब्येत खालावतच गेली.

शेजाऱ्यांनी सांगितल्यानुसार, हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्याअभावी २९ एप्रिलच्या सकाळी अर्जुनचं कोरोनामुळे निधन झाले. नवऱ्याच्या मृत्यूची बातमी कळताच वधु बबलीला मोठा धक्का बसला. मुलीच्या घरच्यांमध्ये खळबळ माजली. दोन्ही कुटुंबावर मोठं संकट कोसळलं

ज्या नवऱ्यासोबत बबलीने आयुष्यभर जगण्याची स्वप्न पाहिली ते स्वप्न ७२ तासांतच भंगलं. ७ जन्म एकत्र राहण्याचं वचन घेतलं तोच ७२ तासांत त्याने साथ सोडली. या संकटामुळे बबलीची अवस्थाही बिकट झाली आहे.

सध्या कोरोनामुळे नवऱ्याचा मृत्यू झाल्यानं परिसर शोकमग्न झाले आहेत. कोणीही काही बोलण्यास तयार नाहीत. आरोग्य विभागाकडून आता नवऱ्याच्या सोबत असणाऱ्यांची सर्वांची चाचणी केली जाणार आहे. लग्नात सहभागी झालेल्यांचीही चाचणी होणार आहे.