CoronaVirus Live Updates : कोरोनाचा कहर! केरळमध्ये तब्बल 41 गर्भवती महिलांचा मृत्यू तर 149 जणांनी केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 07:44 PM2021-10-28T19:44:27+5:302021-10-28T20:11:22+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तब्बल तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 16,156 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 733 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असतानाच काही शहरांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

केरळमध्ये कोरोनाची पहिली लाट आल्यापासून आतापर्यंत 41 गर्भवती महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दक्षिणेकडील राज्यात दीड वर्षापूर्वी व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर केरळमध्ये 41 गर्भवती महिलांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना संसर्ग झालेल्या 149 रुग्णांनी आत्महत्या केल्या आहेत. आरोग्य मंत्र्यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान काँग्रेसचे आमदार टी जे विनोद यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हे उत्तर दिले आहे.

केरळमध्ये गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसचे 9,445 नवीन रुग्ण आढळले असून 93 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्य आरोग्य बुलेटिननुसार, राज्यात सक्रिय प्रकरणांची संख्या 76,554 आहे.

ICMR अभ्यास अहवालानुसार, मे, ऑगस्ट आणि डिसेंबर 2020 मध्ये केरळमध्ये सेरोपॉझिटिव्हिटी दर 0.33%, 0.88% आणि 11.6% आणि मे 2021 मध्ये 44.4% होता. राज्याने या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान सेरोप्रिव्हलन्स अभ्यास केला तेव्हा तो 82.61% पर्यंत वाढला.

राज्यात सेरोपॉझिटिव्हिटी दर वाढण्याची अपेक्षा होती आणि याचे श्रेय लसीकरण आणि लोकांच्या जीवनशैलीतील बदलाला दिले जाऊ शकते. कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देशात जुलैमध्ये कोरोनामुळे होणाऱ्य मृत्यूच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आता चौथ्या क्रमांकावर आहे. मृत्यूदरात पंजाब राज्य पहिल्या क्रमांकावर, उत्तराखंड दुसऱ्या आणि नागालँड तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. दर तासाला कोरोना 14 लोकांचा बळी घेत आहे.

जुलैमध्ये मृत्यूदर 2.02 टक्के होता, तो आता 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सप्टेंबरपासून हा मृत्यूदर स्थिर आहे. राज्यातील 10 फेब्रुवारी ते 22 ऑक्‍टोबर या कालावधीतील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा काढला तर दर तासाला सरासरी 14 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे.

सप्टेंबरपर्यंत राज्यात दर तासाला मृत्यूची संख्या 16 होती, ती ऑक्टोबरमध्ये ती थोडी कमी झाली असल्याने दिलासा मिळत आहे. मुंबईसह राज्यात कोरोनाची दुसरी लाट 10 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे.

9 मार्च 2020 रोजी सुरू झालेल्या साथीच्या आजाराने आतापर्यंत 1,39,925 लोकांचा बळी घेतला आहे. पहिल्या लाटेत 9 फेब्रुवारीपर्यंत 51,360 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीपासून म्हणजेच 10 फेब्रुवारी ते 28 सप्टेंबरपर्यंत 87,542 लोकांचा मृत्यू झाला.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन महिन्यांत अनेक सण येणार आहेत. याच दरम्यान काही समारंभाचं देखील आयोजन करण्यात येईल. मात्र यामुळेच लोकांची मोठ्या संख्येने गर्दी होईल आणि हेच कोरोनाचा वेगाने प्रसार होण्यामागचं कारण ठरू शकतं.

सध्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळत आहे. लोकांनी अत्यंत सतर्क राहणं गरजेचं आहे. घरच्या घरीच सण साजरे करा. सणांच्या काळात लोकांचा हलगर्जीपणा चिंता वाढवू शकतो. त्यामुळचे कोरोना नियमांचं पालन करा असं आवाहन सरकारच्या वतीने करण्यात येत आहे.

Read in English