India-China: रशिया-यूक्रेन युद्धादरम्यान चीनचा घातक निर्णय; भारतासाठी धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 12:43 PM2022-03-05T12:43:05+5:302022-03-05T12:49:27+5:30

India China Faceoff: रशिया-यूक्रेन युद्धाचे पडसाद जगभरात पाहायला मिळत आहे. याचवेळी चीननं घेतलेल्या एका निर्णयानं भारताची चिंता वाढली आहे.

एकीकडे जगात रशिया-यूक्रेन युद्धाची चर्चा होत आहे. रशियानं यूक्रेनवर हल्ला करत युद्ध पुकारलं. त्याला यूक्रेनही प्रत्युत्तर देत आहे. रशिया-यूक्रेन युद्धाचे पडसाद जगभरात पाहायला मिळत आहे. या युद्धामुळे जगात तिसरं महायुद्ध होईल का अशी भीती निर्माण झाली आहे.

जागतिक महायुद्धाच्या सावटाखाली अनेक देश आहेत. त्यात चीननं घेतलेल्या एका निर्णयानं भारताची चिंता वाढली आहे. चीननं त्यांच्या संरक्षण अर्थसंकल्पात(Defence Budget) वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी ७.१ टक्क्यांनी संरक्षण निधी वाढवण्याचं निश्चित केले आहे.

याआधी गेल्या वर्षी चीनमध्ये ६.८ टक्क्यांनी वाढ झाली होती. चीन सरकारने २०२२ च्या आर्थिक वर्षासाठी १७.५७ लाख कोटी रुपयांचे (सुमारे $ २२९.५ अब्ज) संरक्षण बजेट प्रस्तावित केले आहे. हा मसुदा अर्थसंकल्प नॅशनल पीपल्स काँग्रेस अर्थात चीनच्या संसदेच्या वार्षिक अधिवेशनादरम्यान जारी करण्यात आला आहे.

अहवालानुसार, जर याची तुलना केली तर ही वाढ भारताच्या ५.२५ लाख कोटी (सुमारे $७० अब्ज) च्या संरक्षण बजेटच्या तिप्पट आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केला असतानाच चीनने संरक्षण बजेट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज 10 वा दिवस आहे.

अमेरिकेसह सर्व देशांतील तज्ज्ञांनी चिंता व्यक्त करताना आता पुढील नंबर तैवानचा असू शकतो, असं म्हटले आहे. चीन या देशावर कधीही हल्ला करून तो काबीज करू शकतो. येथे त्याने गेल्या वर्षभरापासून घुसखोरी वाढवली आहे.

चीन नेहमीच तैवानवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. चिनी लढाऊ विमाने अनेकदा तैवानच्या सीमेत प्रवेश करतात. नुकतेच, रशियाने युक्रेनवर हल्ला करताच चीनची ९ लढाऊ विमानं पुन्हा तैवानमध्ये शिरली होती. युक्रेनच्या संकटाचा फायदा चीन घेऊ शकतो, अशी भीती तैवानने व्यक्त केली होती.

चीनचे संरक्षण बजेट भारताच्या तुलनेत तिप्पट आहे. यात शंका नाही. आता या वाढीमुळे चीन भारतासाठी आणखी धोके निर्माण करू शकतो, अशी भीती वाढली आहे. तो LAC वर लष्कराच्या जवानांची संख्या वाढवू शकतो. बेकायदेशीर घुसखोरी करण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

याशिवाय त्याच्याकडे अधिक चांगली आणि प्रगत शस्त्रेही असू शकतात. लडाखमध्ये सैनिकांच्या चकमकीत गेल्या वर्षभरापासून चीन आणि भारत यांच्यात तणाव आहे. बैठकांच्या सर्व फेऱ्या होऊनही समस्या जैसे थेच आहे. आजही भारत-चीन यांच्यातील सीमावादाचा मुद्दा ज्वलंत आहे.

चीन युद्ध प्रशिक्षणाला प्रोत्साहन देईल. आणखी एका सरकारी अहवालात म्हटले आहे की चीन २०२२ मध्ये लष्करी शिक्षण आणि युद्ध प्रशिक्षणाला प्रोत्साहन देईल. वॉशिंग्टन पोस्टच्या म्हणण्यानुसार, चीनकडे अमेरिकेनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे लष्करी बजेट आहे आणि तो लांब पल्ल्याच्या आण्विक-सक्षम क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रांमध्ये गुंतवणूक करत आहे.

चीन आपले सामर्थ्य वाढविण्याचे तसेच शेजारी देशांना वादग्रस्त भागावर दावा करून दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. वादग्रस्त सीमा भागांत मे २०२०मध्ये चिनी लष्कराचे अस्तित्व, दशकांमध्ये आतापर्यंत सर्वांत गंभीर तणावपूर्ण स्थितीमध्ये आहे. यामुळे १९७५ नंतर दोन्ही देशांत सीमेवर प्रथमच रक्तरंजित संघर्ष झाला होता.

पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) भारत-चीन यांच्यात तणावाचे वातावरण आहे. १५ जून २०२० चीनच्या सैनिकांनी गलवान घाटीमध्ये पहिला हल्ला केला होता. भारतीय जवानांनी लगेचच सावध होत चीनच्या सैनिकांना चोख प्रत्यूत्तर दिले होते. यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले होते.