Budget 2020 : देशाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या 'या' अर्थमंत्र्यांनी पुढे भुषवले पंतप्रधान आणि राष्ट्रपतीपद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 10:58 AM2020-02-01T10:58:30+5:302020-02-01T11:07:22+5:30

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 26 नोव्हेंबर 1947 ला भारताला स्वातंत्र्यानंतर पहिला अर्थ संकल्प मांडण्यात आला. त्यावेळी षण्मुखम चेट्टी यांनीही पहिल्यांदा लाल सूटकेसमधून अर्थसंकल्प आणला होता. अर्थसंकल्प सादर करणारे काही अर्थमंत्री हे देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती झाले. त्याबाबत जाणून घेऊया.

भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी देशाचा अर्थसंकल्प सर्वाधिक वेळा संसदेत मांडला आहे. सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्यांच्यावर नावावर आहे. भारताचे चौथे पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांनी अर्थमंत्री म्हणून 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. मोरारजीनंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री पी. चिदंबरम आहेत.

चरण सिंह हे देशाचे पाचवे पंतप्रधान (28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980) होते. जनता पार्टीचं सरकार असताना चरण सिंह अर्थमंत्री होते. त्यावेळी त्यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. वयाच्या 84 वर्षी 29 मे 1987 रोजी त्यांचे निधन झाले.

विश्वनाथ प्रताप सिंह हे देशाचे आठवे पंतप्रधान होते. 31 डिसेंबर 1984 ते 24 जानेवारी 1987 या दरम्यान काँग्रेसचं सरकार असताना विश्वनाथ प्रताप सिंह अर्थमंत्री होते.

रामास्वामी वेंकटरमण हे इंदिरा गांधी सरकारमध्ये 14 जानेवारी 1980 ते 15 जानेवारी 1982 पर्यंत अर्थमंत्री होते. वेंकटरमण हे भारताचे आठवे राष्ट्रपती (25 जुलै 1987 ते 25 जुलै 1992) होते.

1991 मध्ये मनमोहन सिंग यांनी अर्थसंकल्प सादर केला. मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री म्हणून केलेलं काम आजही अनेकांच्या लक्षात आहे. देशाच्या आतापर्यंतच्या अर्थमंत्र्यांच्या भाषणांवर नजर टाकल्यास मनमोहन सिंग यांचं भाषण सर्वात मोठं होतं. त्यावेळी त्यांनी दिलेल्या भाषणात 18,177 शब्द होते.

प्रणव मुखर्जी यांनी काँग्रेसचं सरकार असताना 7 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. प्रणव मुखर्जी देशाचे 13 वे राष्ट्रपती (25 जुलै 2012 ते 25 जुलै 2017) होते.

जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या तीन पंतप्रधानांनी आतापर्यंत अर्थसंकल्प सादर केले आहेत. 1970 मध्ये इंदिरा गांधींकडे पंतप्रधान पदासोबतच अर्थमंत्रीपददेखील होतं. अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या.