लॉकडाऊनच्या 27 दिवसांत BROनं बनवला पूल, चीनच्या सीमेपर्यंत थेट पोहोचणार सामान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 05:52 PM2020-04-24T17:52:26+5:302020-04-24T18:01:02+5:30

कोरोनानं जगभरात थैमान घातलेलं असून, अनेक देशांनी लॉकडाऊन केलं आहे. भारतातही लॉकडाऊन करण्यात आलं असून, काही अत्यावश्यक सेवा सुरू आहेत.

विशेष म्हणजे या लॉकडाऊनच्या काळात सीमा रस्ते संघटने(बीआरओ)ने अरुणाचल प्रदेशातील सुबानसिरी जिल्ह्यात सुबानसिरी नदीवर डापोरिजो पूल बांधला आहे.

हा 430 फूट लांबीचा बेली पूल असून, बीआरओ भारत-चीन सीमेवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषे (LAC)पर्यंत 40 टन वजनाच्या वाहनांची वाहतूक करण्यासाठी या पुलाची मोठी मदत होणार आहे.

सोमवारी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी या पुलाचे उद्घाटन केले आणि तो त्वरित जनतेसाठी उघडण्यात आले.

डापोरिजोमुळे हा पूल बांधणे सोपे नव्हते. येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेची दोन परस्परविरोधी क्षेत्रे आसाफीला आणि माजा आहेत.

हा पूल तयार करण्यासाठी बीआरओला दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता, परंतु एका महिन्यात तो त्यांनी पूर्ण करून दाखवला.

एका अधिका-याने सांगितले की, त्यांनी हा पूल तयार करण्यासाठी २४ तास आणि ७ दिवस काम केले. आम्ही सर्वांनी काम सुरू असताना कोरोनापासून बचाव करण्याच्या सर्वच साधनांचा वापर केला होता.

1992मध्ये डापोरिजो येथे बांधलेला एक जुना पूल होता. तो जवळपास जर्जर झाला होता. त्या पुलावरून केवळ 9 टन वजन नेणे शक्य होते.

आता या पुलामुळे अरुणाचल प्रदेश संपूर्ण लेकाबाली-बासर-बामे-डापोरिजो आणि इटानगर-झिरो-राग-डापोरिजो या दोन मुख्य मार्गांना जोडणार आहे.

डापोरिजो येथे फक्त दोन मुख्य पूल होते. डापोरिजोखेरीज तामीन असा इथे आणखी एक पूल आहे, परंतु त्याचा मार्ग खूप खडतर आहे. तो डोंगरातून जात असून, त्या पुलाची क्षमता फक्त 3 टन आहे. अधिका-यांनी सांगितले की, असे बरेच लोक आहेत, ज्यांना सुबानसिरी जिल्ह्याचा विकास नको होता.

या पुलाची संरचना थोडी वेगळीच आहे. पुण्याच्या मिलिटरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञांशी या पुलाच्या डिझाइनवर चर्चा झाली आहे. या पुलाचे काम 17 मार्च रोजी सुरू झाले आणि ते 14 एप्रिल रोजी पूर्ण झाले.

डापोरिजो पूल हा भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसाठी एक मोक्याचं ठिकाण आहे. सर्व पुरवठा, शिधा, बांधकाम साहित्य आणि औषधे या पुलावरून जातात. पुलाचे बांधकाम 23 बीआरटीएफने केले होते.