CoronaVirus : दुबईच्या धर्तीवर भारतातल्या विमानतळांचा होणार कायापालट; दिसणार असं चित्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 12:35 PM2020-05-07T12:35:11+5:302020-05-07T13:41:34+5:30

भारतातील विमानसेवा सध्या तात्पुरती बंद करण्यात आली असली तरी ती लवकरच सुरू करण्यात येणार आहे. पण त्यापूर्वीच विमानतळांच्या रचनेत बरेच बदल केले जाणार आहेत.

सामाजिक अंतर(सोशल डिस्टन्सिंग)चा विचार करता विमान कंपन्या आसन व्यवस्थेत तसा बदल करणार आहेत.

विमानतळांवर केंद्र सरकारच्या नियमांचं पालन करण्यासाठी आसनव्यवस्थेत सामाजिक अंतर राखलं जाणार आहे.

तसेच विमानतळांवर काही सूचना फलकही पाहायला मिळणार आहे. त्या सूचना फलकांवर कोरोना व्हायरसला पसरण्यापासून रोखण्यासाठी मदत करा, साबणानं स्वच्छ हात धुवा आणि सॅनिटायझरचा वापर करा, डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणं टाळा, चेहऱ्यावर मास्क लावा आणि खोकला आल्यास टिश्यूपेपरचा वापर करा, अशा आशयाचा मजकूर लिहिलेला पाहायला मिळणार आहे.

तसेच कोरोना व्हायरस पसरण्यापासून रोखण्यासाठी प्रवाशांना दोन मीटर म्हणजेच ६ फुटांचं सामाजिक अंतर राखा, अशाही सूचना देण्यात येणार आहेत.

विमानतळावरही प्रत्येक आसनव्यवस्था आणि रांगेत दोन मीटर म्हणजेच ६ फुटांचं सामाजिक अंतर कसं राखता येईल, त्यासाठी विमानतळ प्रशासनानं खबरदारी घेतलेली आहे.

हवाई प्रवासासाठी तिप्पट पैसे मोजावे लागू शकतात. सामाजिक अंतर लक्षात घेऊन केवळ एक प्रवासी हा तीन प्रवाशांच्या पंक्तीत बसून, दुसरा प्रवासी त्याच्या मागच्या सीटवर बसणार आहे, अशीसुद्धा विमानातील आसन व्यवस्थेत बदल होणार असल्याची चर्चा आहे.

नागरी उड्डयन संचालनालय (डीजीसीए) विमान पुनर्उड्डाणाची योजना तयार केली आहे.

लॉकडाऊननंतर सरकार कामं नियमितपणे सुरू करणार असून, त्यावेळी ही योजना लागू केली जाऊ शकते.

लॉकडाऊननंतर सुरुवातीच्या आठवड्यात विमान प्रवासाला फारसा प्रतिसाद मिळणार नाही. त्यामुळे दिल्ली, मुंबई, हैदराबाद व अन्य विमानतळांवर दोन मीटर अंतर राखण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

भारतीय विमान कंपन्यांची आर्थिक स्थिती ढासळत आहे. इंडिगो व्यतिरिक्त इतर कोणत्याही एअरलाईन्समध्ये रोख राखीव पैसा जास्त नाही.

180 प्रवाशांची व्यवस्था असलेल्या जागांवर फक्त ६० प्रवासी बसतील, असा बदल केला जाऊ शकतो.

या नुकसानीची भरपाई करण्यासाठी विमान कंपन्या दीड ते तीनपट जास्त भाडे आकारू शकतात.

यासंदर्भात एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, "कालांतराने कोरोना संक्रमण कमी झाल्यानंतर सामाजिक अंतरांचे नियम शिथिल करण्यात येतील."