मालाड येथील मृत्यूतांडवाची भीषणता दाखविणारे फोटो; 18 जणांचा दुर्घटनेत मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 11:10 AM2019-07-02T11:10:20+5:302019-07-02T11:14:04+5:30

मुसळधार पावसामुळे मालाड पूर्व परिसरात असलेल्या पिंपरीपाडा येथील झोपडपट्टीवर भिंत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला असून 60 हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईतील गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे मुंबईसह उपनगरांत ठिकठिकाणी पाणी साचले आहे. यातच अनेक पडझडीच्या घटना घडत आहेत.

सोमवारी रात्री दोनच्या सुमारास पिंपरीपाडा येथील झोपडपट्टीवर संरक्षक भिंत कोसळली. यात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 60 हून अधिक जण जखमी असून चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. याशिवाय अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, घटनास्थळी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) जवान झाले असून बचावकार्य सुरु आहे.

मुख्यमंत्र्यांनी मालाड येथील दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांची शताब्दी रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे. टेकडीवरुन पाण्याचा प्रवाह आल्याने ही दुर्घटना घडली असल्याचं सांगण्यात आलं आहे.

पुढचे तीन-चार दिवस मुंबईला पावसाचा धोका कायम असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मुंबई, ठाणे, कोकण परिसरातील शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर केली आहे.

अत्यावश्यक काम असल्याशिवाय लोकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आलं आहे. हाईटाईड असल्याने पाण्याचा निचरा करण्यास अडचण होत आहे. पोलीस, मुंबई प्रशासनाला हायअलर्ट देण्यात आला आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

मालाड येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच तेथील नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आले आहेत.