Maharashtra Lockdown: रिक्षा-टॅक्सीसह बस आणि लोकल प्रवासासाठी नेमका नियम काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 01:01 PM2021-04-14T13:01:28+5:302021-04-14T13:11:28+5:30

Maharashtra Lockdown: राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज रात्री ८ वाजल्यापासून १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी नेमके नियम काय आहेत? जाणून घेऊयात...

राज्यात 'ब्रेक द चेन' अंतर्गत काही अटी आणि निर्बंध आज रात्री ८ वाजल्यापासून लागू करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू राहणार आहे. पण नेमकं कुणाला प्रवास करता येणार आणि कसा?

लोकल ट्रेन, टॅक्सी, बस, रिक्षा चालकांना तसेच यातून प्रवास करणाऱ्यांसाठी नवी गाईडलाईन्स जारी करण्यात आली आहे.

मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल सेवा सुरुच ठेवण्यात येणार आहे. पण सर्वांना लोकल सेवेचा उपयोग करता येणार नाही. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलमधून प्रवास करता येणार आहे.

ऑटोरिक्षा आणि टॅक्सीसोबतच बस सेवा देखील सुरु राहणार आहे. पण यासाठीही नियम घालून देण्यात आले आहेत.

ऑटोरिक्षामध्ये चालक अधिक दोन प्रवासी तर टॅक्सी आणि चार चाकी वाहनांसाठी चालक अधिक पन्नास टक्के वाहन क्षमता असा नियम घालून देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे यातही अत्यावश्यक काम असेल तरच नागरिकांना प्रवास करता येणार आहे. बस सेवा देखील सुरू राहणार आहे. पण यात केवळ आसन क्षमते इतकेच प्रवासी प्रवास करु शकणार आहेत. उभे प्रवासी बंदी असणार आहे.

सर्व प्रवाशांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना तोंडाला मास्क लावणे सक्तीचे आहे. मास्क नसल्यास पाचशे रुपये दंड केला जाईल. चारचाकी टॅक्सीमध्ये एखाद्या प्रवाशाने मास्क न घातल्यास तो प्रवासी आणि चालकालाही पाचशे रुपये दंड केला जाईल. प्रत्येक खेपेनंतर वाहनं सॅनिटाईझ करणे आवश्यक आहे.

. भारत सरकारच्या नियमानुसार सर्व प्रवासी वाहनांचे चालक आणि इतर कर्मचाऱ्यांनी लसीकरण करणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी कोविड सुसंगत वागणुकीचे दर्शन घडवणेही गरजेचे आहे. टँक्सी आणि अटोरिक्षांसाठी चालकाने स्वतःच्या आणि प्रवास्यांच्यामधे प्लास्टिकचे आवरण घालून संरक्षक कवच निर्माण करायला हवे.

बाहेरगावच्या ट्रेन्ससाठी रेल्वेप्रशासनाने उभे राहून कोणीही प्रवासी प्रवास करणार नाहीत, याची खातरजमा करावी. तसेच सर्व प्रवासी मास्क लावतील, हेही बघावे.

सार्वजनिक वाहतुकीला परवानगी देतानाच ती सुरळीतपणे व्हावी, यासाठी लागणाऱ्या नैमित्तिक सेवाही त्यात समाविष्ट करूनच ही परवानगी देण्यात आलीय. त्यात हवाईसेवेसाठी विमानतळावर दिल्या जाणाऱ्या कार्गोसारख्या सेवा तसेच तिकीटविषयक सेवांचाही समावेश आहे.