"मये कोरोनाचं नव्हं...शेती कायद्याचं भय", पोशिंद्यांची पायपीट अन् मुंबईचं मॅनेजमेंट

By मोरेश्वर येरम | Published: January 25, 2021 12:39 PM2021-01-25T12:39:29+5:302021-01-25T13:01:41+5:30

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात मुंबईत आज हजारो शेतकऱ्यांचा लाँग मार्च पोहोचला आहे. या मोर्चाची ही खास छायाचित्र सारंकाही सांगून जातील.

मुंबईत आज जवळपास १२ हजार शेतकरी पायपीट करत आझाद मैदानात दाखल झाले आहेत. नव्या कृषी कायद्यांना विरोध आणि विविध मागण्यांसाठी हे शेतकरी व कष्टकरी आंदोलन करतायत. पण या आंदोलनाला कोरोनाचीही पार्श्वभूमी आहे हेही लक्षात घ्यायला हवं. (छायाचित्र: दत्तात्रय खेडेकर)

कोरोना सावटाखाली इतक्या मोठ्या मोर्चाला सांभाळणं हे काही सोपं काम नव्हतं. आझाद मैदानात ठिकठिकाणी शेतकरी मोर्चेकरांच्या आरोग्य तपासणीसाठी केंद्र उभारण्यात आली आहेत.

शेकडो किलोमीटर रस्ता पायी तुडवत मुंबईत दाखल झालेल्या सर्व कष्टकरी आणि शेतकऱ्यांना मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

आपल्या पारंपारीक कलांच्या माध्यमातून शेतकरी महिला मोर्चात सहभागी झाल्या आहेत.

राज्याच्या आदिवासी बहुल भागातून हे कष्टकरी मुंबईत पायी दाखल झालेत.

कोरोनाच्या महामारीत इतक्या मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी होण्याबाबत विचारलं असता कोरोनानं नव्हे, तर नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा जीव जाईल, असं सांगत कायद्यांना विरोध दर्शवला.

थंडी, वाऱ्याची पर्वा न करता हे कष्टकरी आपल्या मागण्यांसाठी मुंबईत दाखल झाले आहेत.

आंदोलन ठिकाणी कायदा सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी स्वत: मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आझाद मैदानात उपस्थित आहेत.

नाशिक, धुळे, नंदुरबार अशा राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत.

आझाद मैदानातून हा मोर्चा राजभवनाच्या दिशेनं कूच करणार असल्याचं किसान सभेच्या वतीने सांगण्यात आलं आहे. पण पोलिसांकडून यासाठी परवानगी देण्यात आलेली नसल्याचं विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटलं आहे.