CoronaVirus News : 'या' व्यक्तींनी शक्यतो प्रवास टाळावा, रेल्वे मंत्रालयाचं प्रवाशांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 02:38 PM2020-05-29T14:38:16+5:302020-05-29T15:01:22+5:30

मुंबई : रेल्वे मंत्रालय श्रमिक विशेष गाड्या देशभरात चालवत आहे. परंतु, या सेवेचा लाभ घेत असलेल्या आणि ज्यांची वैद्यकीय, शारीरिक स्थिती आधीपासूनच बिघडलेली आहे, त्यांना कोरोना साथीच्या आजारात अजून धोका वाढण्याची शक्यता आहे.

आधीपासूनच विविध आजार असलेल्या लोकांच्या मृत्यूच्या काही दुर्दैवी घटना प्रवासा दरम्यान घडल्या आहेत.

अशा काही नागरिकांसाठी त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी रेल्वे मंत्रालय आणि गृह मंत्रालयाच्या 17 मे रोजीच्या आदेशानुसार आवाहन केले आहे.

यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, कर्करोग, रोगप्रतिकारशक्ती कमतरता असलेले), गर्भवती महिला, १० वर्षांखालील मुले आणि ६५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी रेल्वेचा प्रवास शक्यतो टाळावा, असे म्हटले आहे.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी शुक्रवारी यासंदर्भात आवाहन करताना सांगितले की, देशातील काही नागरिक यावेळी रेल्वे प्रवास करू इच्छितात आणि त्यांना रेल्वे सेवा मिळावी यासाठी भारतीय रेल्वे परिवार दिवसरात्र सतत कार्यरत आहे.

प्रवासाची आवश्यकता असणा-या देशातील सर्व नागरिकांना रेल्वे सेवा पुरविली जावी यासाठी भारतीय रेल्वे परिवार सतत कार्यरत आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे रेल्वे सेवा पूर्णपणे सुरु करण्यात आली नाही. मात्र, लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांसाठी श्रमिक ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत.

याचबरोबर, येत्या सोमवारपासून भारतीय रेल्वेच्या 200 अतिरिक्त गाड्या धावणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

Read in English